संजय लव्हाडे
केंद्र सरकारने येत्या जुलै महिन्यासाठी साखरेचा केवळ २२ लाख टन कोटा जाहीर केला आहे. हा कोटा तुलनेत कमी असूनही साखरेच्या बाजारभावात मोठी तेजी येण्याची शक्यता नसल्याचे जाणकारांनी स्पष्ट केले आहे. यावर्षी साखरेचे उत्पादन १८ टक्क्यांनी घटून फक्त २६१ लाख टनांवर आले असले, तरीही जुलै महिन्यातील साखरेची मागणी तुलनेने कमी असते.
हवामानात होणाऱ्या बदलामुळे शीतपेयांच्या मागणीत घट होते आणि परिणामी साखरेचा वापर कमी होतो. त्यामुळे कोटा कमी असूनही बाजारभाव स्थिर राहण्याची शक्यता आहे. सध्या साखरेचे दर ४१०० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान आहेत. काही व्यापारी जुलैच्या उत्तरार्धात तेजी आणण्याचा प्रयत्न करत असले तरी, वास्तविक मागणीच्या अभावामुळे ती फार काळ टिकण्याची शक्यता नाही.
दरम्यान, हरभरा आणि ज्वारीच्या बाजारात सध्या तेजीचा कल आहे. खरीप हंगामाची सुरुवात आणि मागणी वाढ यामुळे या उत्पादनांचे दर चढले आहेत. मात्र, आषाढ महिन्यात उपवासाची सणवार असल्यामुळे साबुदाणा आणि भगर यांना मागणी असते, तरी यंदा लागवड क्षेत्र वाढल्याने उत्पादनही भरपूर झाले आहे. परिणामी, या उत्पादनांमध्ये अपेक्षित तेजी दिसून येत नाही.
सोने-चांदीबाबत बोलायचे झाल्यास, मागील काही दिवसांपासून या मौल्यवान धातूंमध्ये सातत्याने मंदीचे वातावरण आहे. इराण आणि इस्रायलमधील तणाव काहीसा निवळल्यामुळे आणि अमेरिकन डॉलरमध्ये थोडीशी वाढ झाल्याने जागतिक बाजारात सोन्याच्या किमती घसरल्या आहेत. शनिवारी जालना येथील सोन्याच्या दरात तब्बल एक हजार रुपयांची घसरण झाली असून, तो आता ९७ हजार रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. चांदीही सध्या एक लाख सहा हजार रुपये प्रतिकिलो दराने स्थिर आहे.
अनेक गुंतवणूकदारांनी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सोनं-चांदीऐवजी शेअर बाजारात गुंतवणूक वाढवलेली आहे. परिणामी, सोनं-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. या घडामोडी शेतकरी, व्यापारी गुंतवणूकदारांसाठी काही आठवडे निर्णायक ठरू शकतात.
जालना येथील शेतमाल बाजारातील बाजारभाव (प्रतिक्विंटल)
गहू - २४०० ते ५०००
ज्वारी - २२०० ते ४१००
बाजरी - २००० ते २७००
मका - २००० ते २३५०
तूर - ५००० ते ६७००
हरभरा - ५३०० ते ५७४०
मूग - ५७०० ते ६३५०
उडीद - ४००० ते ६६००
करडी - ७१५०
सूर्यफूल - ४८००
सोयाबीन - ३४०० ते ४३००
पामतेल - १२७००
सूर्यफूल तेल - १४४००
सरकी तेल - १३३००
सोयाबीन तेल - १२४००