सातारा : जिल्ह्यातील सोयाबीन क्षेत्रात वाढ होत असलीतरी दराकडून मात्र, शेतकऱ्यांची निराशा होत असते. मात्र, आता तुटवडा असल्याने तब्बल तीन वर्षांनंतर सोयाबीनचा क्विंटलचा दर पाच हजारांवर गेला आहे.
सातारा बाजार समितीत तर ५ हजार ४०० पर्यंत भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळालेला आहे. तसेच सोयाबीनच्या दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.
जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वांत मोठा असतो. २०२४ मध्ये खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर निश्चित करण्यात आले होते. पण, चांगल्या पावसामुळे ३ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती.
त्यातच जिल्ह्यात सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ७४ हजार ८०० हेक्टर निश्चित करण्यात आलेले. पण, प्रत्यक्षात ९६ हजार ६६ हेक्टरवर पेरणी झाली.
यामुळे सोयाबीनचे उत्पादन वाढले. पण, शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळाला नाही. घरात सोयाबीन ठेवले. पण, चार हजारांच्यावर दर गेला नव्हता.
तर सोयाबीनला दर कमी मिळत असल्याने २०२५ च्या खरीप हंगामात क्षेत्रात घट झाली. अतिवृष्टी झाल्याने पिकाचे नुकसान झाले. परिणामी सोयाबीनचे उत्पादन कमी झाले आहे.
सध्या जागतिक युद्धस्थिती आणि बाजारातील तुटवडा यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. तीन वर्षात प्रथमच क्विंटलचा भाव पाच हजारांवर गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सोयाबीनला ५,३२८ हमीभाव
◼️ केंद्र शासनाच्यावतीने प्रमुख पिकांचे हमीभाव जाहीर करण्यात येतात.
◼️ २०२४ यावर्षी सोयाबीनचा हमीभाव ४ हजार ८९२ रुपये होता.
◼️ तर मागीलवर्षी २८ मे रोजी सोयाबीन हमीभावात ४३६ रुपयांची वाढ करण्यात आली.
◼️ त्यामुळे सध्या क्विंटलला ५ हजार ३२८ रुपये हमीभाव आहे.
◼️ सध्या सोयाबीनला हमीभावाप्रमाणे दर मिळत असल्याचे दिसत आहे.
पाच वर्षांत एकदाच १० हजारांच्या पुढे
वर्ष - सरासरी भाव (क्विंटल)
२०२० - ३,८००
२०२१ - ४,५००
२०२२ - १०,०००
२०२३ - ५,५००
२०२४ - ४,४००
२०२५ - ४,१००
२०२६ - ५,४००
बाजार समितीतील दर
सातारा बाजार समितीत दररोज सोयाबीनची आवक होते. सध्या क्विंटलला ५ हजारांपासून ५ हजार ४०० रुपयांपर्यंत सरासरी दर मिळत आहे. सोयाबीनचे क्षेत्र वाढलेले आहे.
अधिक वाचा: यंदा ज्वारीच्या भाकरीची चव महागणार; मालदांडी ज्वारीला प्रतिक्विंटल काय मिळतोय दर?
