लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात लक्षणीय वाढ झाल्याने बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे. सध्या बाजार समितीत दररोज १५ ते १८ हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत असून, प्रतिक्विंटल सुमारे ५ हजार ९०० रुपये दर मिळत आहे. हा दर शासकीय हमीभावापेक्षा सुमारे ५०० रुपये अधिक असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळत आहे.
सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भरून निघण्यास मदत होत आहे. खुल्या बाजारात हमीभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याने आणि रोख स्वरूपात व्यवहार होत असल्याने शेतकऱ्यांचा कल बाजार समितीकडे वाढला आहे. अनेक शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी केली असली तरी सध्या अधिक दराच्या अपेक्षेने ते बाजार समितीतच विक्री करत आहेत.
यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ पैसे मिळत असून, आर्थिक अडचणी कमी होत आहेत. दरम्यान, राशीनंतर बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची बाजारात विक्री केली. त्यांना प्रतिक्विंटल ३ हजार ते ३ हजार २०० रुपये दर मिळाला. पावसात सोयाबीन भिजल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला.
एकीकडे दर मिळाला नसल्याने उत्पादन खर्चही पदरी पडला नाही. आता ८० टक्के शेतकऱ्यांकडील सोयाबीन विक्री झाल्यानंतर दरात वाढ झाल्याने याचा फायदा नेमका कुणाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
व्यापाऱ्यांना कसा फायदा?
दुसरीकडे, यापूर्वी सोयाबीनची साठवणूक करून ठेवलेल्या व्यापाऱ्यांना दरवाढीचा मोठा फायदा होत आहे. मागील काही महिन्यांत कमी दरात खरेदी केलेले सोयाबीन आता जास्त दराने विक्री करता येत असल्याने व्यापाऱ्यांच्या नफ्यात वाढ झाली आहे. बाजारात वाढलेली आवक आणि चांगली मागणी यामुळे व्यवहारही वेगाने होत आहेत.
अडत बाजारात चैतन्य
दरवाढीमुळे बाजार समितीत वर्दळ वाढली असून, हमीभाव खरेदी केंद्रांपेक्षा खुल्या बाजारात व्यवहार अधिक होताना दिसत आहेत. आगामी काळात आवक आणि दर दोन्ही स्थिर राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सोयाबीनच्या दरवाढीमुळे शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही दिलासा मिळाला असून, लातूर मार्केट यार्डातील वातावरण सकारात्मक झाले आहे.
हमीभाव खरेदी केंद्रांकडे पाठ
राज्य शासनाने सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. खुल्या बाजारापेक्षा चांगला दर असल्याने अनेक शेतकऱ्यांनी नोंदणीची किचकट प्रक्रिया पूर्ण केली. आता मात्र खुल्या बाजारात सोयाबीनचे दर वाढत असल्याने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असल्याचे दिसून येत आहेत. सध्या शेतकऱ्यांचा ओढा बाजार समितीकडे अधिक आहे.
