उन्हाळा म्हटलं की रसाळ कलिंगडाची (टरबूज) मागणी वाढते, पण यंदा परिस्थिती उलटी झाली आहे. निसर्गाची अवकृपा आणि जागतिक घडामोडींच्या कात्रीत कलिंगड (टरबूज) उत्पादक शेतकरी पुरता अडकला आहे.
काही दिवसांपूर्वी भाव खाणारे कलिंगड आता कवडीमोल दराने विकले जात असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
मदतीचा हात नाही; ना विमा, ना अनुदान
• टरबूज, खरबूज यांसारखी वेलवर्गीय पिके शासकीय मदतीच्या चौकटीत बसत नाहीत.
• या पिकांना ना शासनाचे विशेष अनुदान मिळते, ना पीक विम्याचे संरक्षण. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास शेतकऱ्याला संपूर्ण झळ सोसावी लागते.
१० ते १५ रुपये किलोचा भाव
काही दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात ३० ते ४० रुपये किलोने मिळणारे कलिंगड आता अवघ्या १० ते १५ रुपयांवर आले आहे.
दरवाढीला 'या' कारणांमुळे बसला ब्रेक
पोषक वातावरणामुळे यंदा उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे मागणीत घट झाली असून, आखातातील युद्धामुळे कलिंगडाच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. परदेशात जाणारा माल स्थानिक बाजारात अडकला आहे.
बाजारात दराची पडझड
बाजारात कलिंगडाला सध्या प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये असा दर मिळत आहे. म्हणजेच शेतकऱ्याच्या हातात प्रति किलो केवळ ५ ते ८ रुपये पडत आहेत.
खर्चही निघेना; वाहतूक परवडेना
शेतातून कलिंगड तोडणीसाठी लागणारी मजुरी आणि बाजारापर्यंत पोहोचविण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च पाहता, मिळणारा भाव अत्यंत तुटपुंजा आहे.
व्यापारी फिरवेनात तोंड; शेतकरीच उतरले रस्त्यावर
• बाजारात दर नसल्याने व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून माल उचलणे बंद केले आहे.
• परिणामी, शेतकरी स्वतः ट्रॅक्टर किंवा टेम्पो घेऊन रस्त्याच्या कडेला बसून माल विकताना दिसत आहेत.
खरबुजाचीही तीच अवस्था
केवळ कलिंगडच नाही, तर खरबुजाचे दरही जमिनीवर आले आहेत. खरबुजालादेखील अपेक्षित उठाव नसल्याने हे फळही पडून खराब होत आहेत.
विक्रीअभावी फेकून देण्याची वेळ
कडाक्याच्या उन्हातही विक्री होत नसल्यामुळे कलिंगड सडू लागली आहेत. विक्रीअभावी ते फेकून देण्याची वेळ आली आहे.
