कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या टोमॅटोचे यावर्षी भाव गडगडल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. नारायणगाव मार्केट कमिटी येथे मार्केटमध्ये ३० रुपये ते ७० रुपये २० किलोच्या प्रति क्रेटचा भात मिळत असल्याने मोठे संकट आले आहे.
त्यामुळे टोमॅटो उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत असल्याने सांगा शेतकऱ्यांनी जगायचं कसं, असा सवाल टोमॅटो उत्पादकांमधून विचारला जात आहे.
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील ओतूर, डिंगोरे, रोहोकडी, धोलवड ठिकेकरवाडी, उदापूर, आंबेगव्हाण, अहीनवेवाडी परिसरातील अनेक शेतकरी अल्पकाळात भरपूर व रोख उत्पन्न देणारी पिके म्हणून टोमॅटो है पीक घेतात.
टोमॅटोचे पीक नगदी व भांडवली असल्याने लागवडीपासून काढणीपर्यंत मोठा खर्च होतो. पण सध्या टोमॅटो पिकाला बाजारभाव नसल्याने शेतकरी हवालदिल, लाखो रुपये भांडवल घालून पोटच्या पोराप्रमाणे पिकलेली शेती आज बाजारात कवडीमोल झाल्यामुळे शेवटी विळा लावण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे.
टोमॅटोचे भाव घसरल्याने आर्थिक नुकसान होत आहे. सुरुवातीपासूनच टोमॅटोचे दर वाढते नसून कमी होत अशी परिस्थिती आहे. १ एकरला सरासरी दीड लाख रुपये खर्च येतो खर्चाच्या तुलनेत कवडीमोलाची किंमत टोमॅटोला मिळत आहे.
पिकांचे बाजार नसताना नुकसान झालेले असतानादेखील काही शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पीक वाढवले. परंतु, त्याचे दर घसरल्याने शेतकरी कोसळू लागला आहे. केलेला खर्चही निघत नसल्याची खंत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
शेतकरी स्थानिक बाजारपेठेत टोमॅटो विकत असून तेथेही कमी भावात विक्री होत आहे. त्यामुळे काही टोमॅटो उत्पादक यांनी दर नसल्याने टोमॅटो शेतात ठेवणे पसंत केले आहे.
टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी, मशागत, रोपे, फवारणी, आधार देण्यासाठी लागणाऱ्या काठचा व तारा, सुतळ्या आणि त्यासाठी द्यावी लागणारी मंजुरी ज्यावेळी प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात होते त्यावेळी ही खर्च मोठ्या प्रमाणात होतो.
अशा परिस्थितीत न परवडणारा खर्च करून पिकवलेल्या टोमॅटो अत्यंत कमी दर मिळत आहे. यामुळे उत्पादकांच्या डोळ्यात पाणी उभा राहीले आहे. उत्पादन आणि उत्पन्न तसेच खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी बेहाल झाला आहे.
नारायणगाव मार्केट कमिटी येथे मार्केटमध्ये ३० रुपये ते ७० रुपये २० किलोच्या प्रतिकॅरेटचा भाव मिळत असल्याने मोठे संकट आले आहे. यात गाडी भाडेदेखील सुटत नाही आजमितीला महिला मजुराला ६०० रुपये रोज आणि पुरुषाला मजुरी ८०० ते २०० रुपये द्यावे लागतात. उत्पादन, खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी बेहाल झाला आहे. - मनोज डुंबरे, टोमॅटो उत्पादक शेतकरी.
कांदा, टोमॅटो, सोयाबीन मिळणारा भाव त्या भावातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकरी अधोगतीला चालला आहे फायद्याची तर बातच सोडा अशीच काहीशी परिस्थिती सर्व पिकाची झाली असून सर्वच पिकांचे धोरण सरकारने आखून भाव वाढवले तरच हा शेतकरी तगेल; अन्यथा आजही शेतकऱ्याची अवस्था ना घर का? ना घाटका ? अशीच आहे. - हेमंत डुंबरे, नागरिक.
हेही वाचा : ऑनलाईन माहिती घेत रणजित करताहेत शेती; १० गुंठे क्षेत्रात झाली अडीच लाखांची पपई