रमजान महिन्याचा शेवटचा खंड सुरू आहे. अवघ्या काही दिवसांवर ईद येऊन ठेपली असून शिरखुर्मासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या सुकामेव्याला मागणी वाढली आहे. दिवाळीपासून सुकामेव्याचे दर स्थिर होते.
मात्र, आता सुकामेव्याच्या बाजारात तेजी आली आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिकची रक्कम मोजावी लागत आहे. गेल्यावर्षी ८०० रुपयांवर असलेले बदाम एक हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत.
रमजान महिन्यात शिरखुर्म्याचा आनंद...
मुस्लीम बांधवांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या रमजानचा महिनाभर उपवास केला जातो. सूर्यास्तानंतर फळे व सुकामेवा खाऊन उपवास सोडला जातो. त्यामुळे या महिन्यात फळे व सुकामेव्याची मोठी खरेदी होते.
शिरखुर्म्यासाठी काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, चारोळी, मनुका, सुके खजूर आदी सुकामेवा लागतो. खोबरे, काजू, मनुके व अन्य पदार्थाची महाराष्ट्रासह तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांतून आयात-निर्यात केली जाते.
यंदा सुकामेव्याचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत. आयात खर्च, वाहतूक खर्च आणि रमजानमुळे वाढलेल्या बाजारातील मागणीमुळे दर वाढले. - जमील खान, विक्रेते.
असे आहेत किलोचे दर....
बदाम - ८५० ते १०००
काजू - ८५० ते १२००
पेंडखजूर - १५० ते २५००
अंजीर - ८०० ते १०००
अक्रोड मगज - ८०० ते १०००
खारीक - १५० ते २००
