जालिंदर शिंदे
घाटनांद्रे: अनेक अस्मानी संकटांवर मात करत घाटमाथ्यासह संपूर्ण कवठेमहांकाळ तालुक्यात आता द्राक्ष हंगामाला सुरुवात झाली असून, बेदाणा निर्मितीसाठीचे शेडही सज्ज झाले आहेत.
सततच्या बदलत्या हवामानाचा फटका बसल्याने तसेच औषधी, खते व मजुरांवर मोठा खर्च झाल्याने बळीराजा मोठ्या दराची अपेक्षा बाळगून आहे. तसेच द्राक्ष खरेदीसाठी व्यापारीही तालुक्यातील काही भागांत दाखल झाले आहेत.
फसवणुकीचा पूर्वानुभव लक्षात घेता, द्राक्ष उत्पादक शेतकरी रोखीनेच द्राक्ष विक्रीस प्राधान्य देत आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात द्राक्ष शेतीस पूरक वातावरण असल्याने पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
तालुक्याच्या घाटमाथ्यावरील घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी, कुंडलापूर, कुची परिसरात ४५० हेक्टर, तर उर्वरित तालुक्यांत सुमारे ३६५० हेक्टर द्राक्ष पिकाचे क्षेत्र आहे.
महागडी खते, औषधी, वाढलेली मजुरी याबरोबरच यावर्षी अवकाळी, ढगाळ वातावरण व परतीच्या पावसाने द्राक्ष शेतीला चांगलाच फटका बसला आहे.
अशा परिस्थितीत बळीराजाने नेटाने द्राक्ष बागा जगविल्या आहेत. सध्या सप्टेंबर महिन्यात आगाप छाटणी घेतलेल्या बागांचा द्राक्ष विक्री हंगाम सुरू झाला आहे.
द्राक्षाला प्रति चार किलोस दर पुढीलप्रमाणे
सुपर, अनुष्का, एसएस जातींच्या दाक्षासाठी: ३०० ते ३७५ रुपये.
काळी दाक्षे: ४०० ते ६०० रुपये.
माणिक चमन:२२५ ते २७५ रुपये.
बेदाणा निर्मितीचे हजारो शेड
रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर बेदाणा निर्मितीसाठीची शेडही सज्ज झाली आहेत. कुची ते सांगोलादरम्यान हजारो बेदाणा निर्मितीची शेड उभारली जात आहेत. द्राक्ष खरेदीसाठी केरळ, आंध्रप्रदेश, बिहार, कोलकात्ता व मुंबई येथील द्राक्ष व्यापारी तालुक्यात दाखल झाले आहेत.
अधिक वाचा: Shevga Powder Business : शेवग्यापासून पावडर बनविणे प्रक्रिया व्यवसायात कशा आहेत संधी? वाचा सविस्तर