मेहरून नाकाडे
रत्नागिरी: नैसर्गिक संकटामुळे आंबा पीक दुष्टचक्रात सापडले आहे. मात्र, ऑक्टोबरमध्ये आलेला फुलोरा देवगड (जि. सिंधुदुर्ग) येथील शेतकऱ्याने जपल्यामुळे तयार झालेला हापूस रत्नागिरीच्याबाजारात विक्रीसाठी दाखल झाला आहे.
यावर्षीच्या हंगामातील हा पहिला आंबा विक्रीला आल्याचे रत्नागिरीतील आंबा विक्रेते सतीश पवार यांनी सांगितले. गतवर्षी पावसाळा नोव्हेंबरपर्यंत लांबल्यामुळे ऑक्टोबर हिट जाणवलीच नाही.
त्यानंतर डिसेंबरपासून थंडीला सुरुवात झाली. कडाक्याच्या थंडीमुळे फुलोरा मोठ्या प्रमाणावर आला. त्यामुळे यावर्षी आंबा पीक चांगले येण्याची आशा पल्लवित झाली होती.
जानेवारीमध्येही थंडीचे प्रमाण चांगले होते. परंतु, कडाक्याच्या थंडीमुळे फळधारणा झालीच नाही शिवाय हवामानातील बदलामुळे मोहर करपला. सध्या नवीन मोहर येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
परंतु, थंडी गायब झाली असून, उष्मा वाढला आहे. त्यामुळे नवीन मोहराला फळधारणा झाली तर हा आंबा एप्रिल व मे मध्येच बाजारात येण्याची शक्यता आहे.
मात्र, देवगडमधील एका शेतकऱ्याने ऑक्टोबरमध्ये आलेल्या मोहराची जपणूक केल्यामुळे चांगली फळधारणा झाली आहे. हा आंबा तयार झाला असून, विक्रीसाठी बाजारातही दाखल झाला आहे.
रत्नागिरीतील गोखले नाका येथे गेले दोन पिढ्या आंबा विक्री व्यवसाय करणाऱ्या पवार यांच्या स्टॉलवर हा आंबा विक्रीसाठी आला आहे. या आंबा पेटीची पूजा करून पवार यांनी देवगड हापूस विक्रीसाठी ठेवला आहे.
डझनाला चार ते सहा हजार रुपये इतका दर
◼️ यावर्षीच्या आंबा हंगामातील हा पहिलाच आंबा रत्नागिरीऐवजी देवगडमधील दाखल झाला आहे.
◼️ चार ते पाच डझनच्या आंबा पेट्या असून, डझनाला चार ते सहा हजार रुपये दर मिळाला आहे.
◼️ याशिवाय रत्ना हापूसची बिटकीही त्यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असून, साडेसातशे रुपये डझन दराने बिटकीची विक्री सुरू आहे.
अधिक वाचा: देशातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर ३३ लाख कोटी रुपयांचे कृषी कर्ज; केद्र सरकार कर्जमाफी करणार का?
