नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याचे दर एकदम कोसळल्याने प्रतिकिलो ५० पैसे भाव मिळत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या आहेत; पण कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी दहा रुपये किलोपर्यंत भाव राहिला आहे. आवक जरी वाढली असली तरी दर इतर बाजार समित्यांपेक्षा चांगला आहे.
कष्टाने पिकवलेल्या कांद्याला ५० पैसे प्रतिकिलो भाव नाशिक जिल्ह्यात मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे; पण कोल्हापूर बाजार समितीमध्ये गेल्या आठ दिवसांपासून सरासरी भाव हा १० रुपये किलोपर्यंत राहिला आहे. किमान भाव ५ रुपये असला तरी कमाल १७ रुपयांपर्यंत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन अत्यल्प आहे. शेतकरी स्वताला खाण्यासाठीच कांदा पिकवतोय, त्यामुळे कोल्हापूर बाजार समितीत परजिल्ह्यातील कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होते. राज्यातील बाजार समित्यांच्या तुलनेत कोल्हापुरात चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची येथे पसंती असते.
सध्या, नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव कोसळले असताना कोल्हापूर समितीमध्ये भाव टिकून आहे. येथून कांदा खरेदी करून दक्षिण भारतासह कोकणात पाठवला जातो. त्यामुळे कितीही आवक वाढली तरी उठाव त्या पटीत होत असल्याने दर चांगला मिळण्यामागे हे एक कारण असू शकते.
गेल्या पाच दिवसांतील बाजार समितीमधील कांद्याची आवक
| तारीख | आवक पिशव्या | किमान दर | कमाल दर |
| ५ मे | ११,६३२ | ५ | १५ |
| ६ मे | १६,६४५ | ५ | १४ |
| ७ मे | ९,१५० | ५ | १२ |
| ८ मे | १३,२२१ | ५ | १४ |
| ९ मे | १६,८९० | ५ | १७ |
कोल्हापूर बाजार समितीत कांद्याची आवक वाढली असली तरी येथे तुलनेत दर चांगले आहेत. शेतकऱ्यांना दर चांगला मिळण्यामागे येथील व्यापाऱ्यांचे धोरणही कारणीभूत आहे. - तानाजी दळवी, सचिव, बाजार समिती कोल्हापूर.
हेही वाचा : उन्हात काम करत असाल तर काळजी घ्या; हृदय अन् किडनीवर येतोय ताण