पुणे: गोड, आंबट चवीची संत्री म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. सध्या मार्केट यार्डातील फळ बाजारातअहिल्यानगर जिल्ह्यासह दिल्ली येथून मोठी आवक वाढली आहे.
त्यामुळे भावात १० दिवसाच्या तुलनेत सुमारे २० टक्क्यांनी घट झाली आहे. दिल्ली येथून येणाऱ्या किन्नू संत्रीला घाऊक बाजारात किलोला दर्जानुसार ४० ते ६० रुपये दर मिळत आहे.
अहिल्यानगर संत्रीला दर्जानुसार २५ ते ८० रुपये भाव मिळत असल्याची माहिती मार्केट यार्डातील संत्रीचे व्यापारी सोनू ढमढेरे व युवराज काची यांनी दिली.
अहिल्यानगर जिल्ह्यातून बांग्लादेश आणि केरळ येथे संत्रीची निर्यात होत होती. मात्र, मागणी घटल्यामुळे तेथील निर्यात थांबली आहे. त्यामुळे १० दिवसाच्या तुलनेत तेथून येथे होणारी आवक २० टक्क्यांनी वाढली आहे.
परिणामी, घाऊक बाजारात भावात २० टक्केंनी घट झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातून ४० - ५० टन, तर दिल्ली येथून ५ ते ७ हजार कॅरेटची आवक झाली.
दिल्ली येथून ५ ते ७ हजार कॅरेटची आवक झाली. एका कॅरेटमध्ये २० किलो संत्री असतात. पुढील १५ दिवस ही आवक सुरू राहणार आहे. तुर्तास आवक वाढून भावात घट झाल्याने सर्वसामान्यांना संत्रीची चव चाखता येणार आहे.
संत्रीला बाजारात मोठी मागणी आहे. त्या तुलनेत अहिल्यानगरसह दिल्ली येथून होणारी संत्रीची आवक वाढली आहे. त्यामुळे भावात २० टक्केनी घसरण झाली आहे. - सोनू ढमढेरे, संत्रीचे व्यापारी, मार्केट यार्ड
अधिक वाचा: शेत पाणंद रस्ते दिसणार आता ऑनलाईन; योजना राबवण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांना मिळाले विशेष अधिकार
