मान्सूनपूर्व पावसाने नुकसान झालेल्या उन्हाळी पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. त्यानुसार पंचनाम्याचे काम सुरू झाले आहेत.
पण अनेक शेतकऱ्यांनी पावसाने उघडीप दिल्यानंतर पिकांची काढणी केली आहे, त्यामुळे पंचनामा कशाचा करायचा? असा पेच कृषी विभागापुढे आहे.
मे महिन्यात २० दिवस अधूनमधून जोरदार पाऊस झाला. उन्हाळी पिकांची काढणी मे च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत केली जाते. त्यानंतर खरीप पेरणीसाठी जमीन तयार केली जाते.
मात्र, यंदा पिके काढणीच्या वेळीस पाऊस सुरू झाला परिणामी, उन्हाळी पिके शिवारातच उभी राहिली. पाणी साचल्याने भात, भुईमुगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने पंचनामे करण्याच्या सूचना कृषी सहायक, तलाठी यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पंचनाम्याचे काम सुरू आहे. कृषी सहायक, तलाठ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून फोटोसह नुकसानीची माहिती भरायची आहे.
पण, अनेक ठिकाणी पाऊस थांबल्यानंतर अधिक नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी पिकांची काढणी केली आहे. त्यामुळे पंचनामा करायचा कसा? असा पेच यंत्रणेसमोर होता.
पंचनाम्यासोबत आवश्यक कागदपत्रे
- बँक पासबुक झेरॉक्स.
- आधार कार्ड झेरॉक्स.
- ८ 'अ'चा चालू उतारा.
- फार्मर आयडी नोंदणी प्रत.
- सामाईक क्षेत्र असेल तर संमती पत्र.
कापणी झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी भरपाईचा प्रस्ताव द्या
◼️ विविध भागांत नुकत्याच झालेल्या पावसामुळे कापणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा प्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
◼️ मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रारंभी राज्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला गेला. त्यावेळी विविध मंत्र्यांनी कापणी केलेल्या पिकांचे नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित केला.
◼️ मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली.
अधिक वाचा: Namo Kisan Hapta : नमो शेतकरी सन्मान योजनेच्या हप्त्यात वाढ होणार? जाणून घ्या सविस्तर