यंदा मान्सूनवर एल निनोचा प्रभाव राहण्याचा प्राथमिक अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दुसरीकडे उन्हाची तीव्रता अधिक असताना मार्च आणि एप्रिल महिन्यात सातत्याने अवकाळी पाऊस पडतो आहे.
कृषी विभागाकडून अवकाळीच्या पंचनाम्यासोबत आता खरीप हंगामाच्या पेरणीच्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ७ लाख ५६ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले असून मका, कापूस अन् सोयाबीनला शेतकऱ्यांची पसंती दिसून येते.
मागील काही वर्षात जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र वाढत आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ५ लाख ६२ हजार सरासरी क्षेत्र असताना यंदा जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या साडेसात लाख हेक्टरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. या क्षेत्रासाठी ९२ हजार ४६३ क्विंटल बियाणे शासकीय व खासगी कंपन्यांकडून उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रासह उत्तर आणि पूर्व भारतातील तापमान वाढले आहे. अनेक भागांमध्ये तापमान ४३ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. पुढील काही दिवसांमध्ये तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. काही भागात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव असणार असून, भारतीय हवामान विभागाने तापमान वाढवण्याचा इशारा दिला आहे.
९२ हजार क्विंटल बियाणे मागणी
अहिल्यानगर जिल्ह्यात खरिपासाठी ७ लाख ५६ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आलेले आहे. तर हंगामासाठी ९२ हजार ४६३ क्विंटल बियाणांची मागणी करण्यात येणार असून यात २७ हजार ५३५ हेक्टर शासकीय तर ६४ हजार ९२८ हेक्टरवरील बियाणे खासगी कंपन्यांकडून उपलब्ध करण्यात येणार आहे.
पीकनिहाय नियोजित क्षेत्र
| पिके | क्षेत्र (हेक्टर) |
| भात | २१ हजार |
| बाजरी | ६७ हजार |
| मका | १ लाख १७ हजार |
| तूर | ७७ हजार |
| उडीद | ७६ हजार |
| मूग | ५२ हजार |
| सोयाबीन | १ लाख ९० हजार |
| कापूस | १ लाख ५६ हजार |
मे महिन्यात मान्सून येणार
युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टच्या अंदाजानुसार यावर्षी मान्सूनचे लवकर आगमन होऊ शकते. गेल्या वर्षी म्हणजे २०२५ मध्ये २७ ते २९ मे दरम्यान भारतात मान्सून दाखल झाल होता. यावर्षीही मे च्या शेवटच्या आठवड्यात मान्सून दक्षिण भारतात दाखल होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हेही वाचा : पांढरेशुभ्र दूध सुद्धा आरोग्याला ठरू शकतं धोकादायक? जाणून घ्या सविस्तर
