अशोक डोंबाळे
सांगली : शेतीचा वाढता खर्च आणि घटलेले उत्पन्नामुळे शेती व्यवसाय आतबट्ट्याचा असल्याची व्यथा शेतकऱ्यांची आहे. उत्पन्नाच्या दृष्टीने शेती परवडत नसल्याचे बोलले जात असले, तरी अलीकडे शेती हा गुंतवणुकीच्या दृष्टीने प्राधान्याचा विषय ठरला आहे.
कारण गेल्या ४२ वर्षांत शेतीचे प्रतिएकर भाव तब्बल १५० पटीपेक्षा जास्त वाढले आहेत. त्यामुळे शेती उत्पन्नापेक्षा गुंतवणुकीतून जास्त परतावा देत आहे. डॉक्टर, शासकीय अधिकारी, बिल्डर्ससह व्यावसायिकांनी जमिनीचे भाव वाढविल्याचे चित्र आहे.
खासगीत शेतीचे कोट्यवधींचे व्यवहार होत असले तरी रेडी रेकनर दराने दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदवण्यात येत आहेत. शहर परिसर व महामार्गालगतची शेतीचे भाव गगनाला भिडले आहेत.
डॉक्टर्स, शासकीय अधिकारी, बिल्डर्स, उद्योजक, व्यावसायिक गुंतवणूक करत आहेत. दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी आणि जमीन विकसित करणाऱ्या ठेकेदारांकडील माहितीनुसार गेल्या ४२ वर्षांत जमिनीचे दर दीडशे पटींनी वाढले.
मोठे शेतकरी झाले अल्पभूधारक
◼️ झपाट्याने वाढत असलेली लोकसंख्या, तुलनेत शेतीचे क्षेत्र तेवढेच असल्याने तुकडीकरण होत आहे.
◼️ शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक बनले आहेत. त्यातच शेतीचे प्रतिएकर भाव लाखमोलाचे झालेले आहेत.
◼️ त्यामुळे शेती खरेदी करणे हे मूळ शेतकऱ्यांच्या आता आवाक्याबाहेरचे काम झालेले आहे.
◼️ आगामी पिढ्यांचा विचार करून शेतकरी शेती विकत घेण्यास आता धजावत नाहीत.
◼️ त्यातच शेती खरेदी-विक्रीचे व्यवहार आता कमी होत असल्याने चढ्या भावाने व्यवहार होताना दिसत आहेत.
५६० पटींनी महामार्गालगतच्या शेतीच्या भावात वाढ!
◼️ गेल्या ४२ वर्षांत राष्ट्रीय महामार्गालगतच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या शेतीच्या भावात तब्बल ५६० पटींपेक्षा अधिक वाढ झाल्याचे दिसून येते. १९८२ मध्ये महामार्गालगतच्या शेतीचे प्रतिएकर दर फक्त दीड लाख रुपयापर्यंत होते.
◼️ २०२५ मध्ये हेच दर वाढून एक ते दोन कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. विशेषतः पेट्रोल पंपाजवळील किंवा उद्योग-व्यवसायाच्या दृष्टीने उपयुक्त अशा ठिकाणच्या शेतीस हे भाव मिळत आहेत.
◼️ सद्य:स्थितीत महामार्ग व प्रमुख रस्त्यांलगतची शेती वगळता, इतर शेतीचे प्रतिएकर भाव सुमारे १५ ते २५ लाख रुपयांवर पोहोचले आहेत.
गेल्या ४० वर्षांतील प्रतिएकर शेतीचे भाव
वर्ष - शेतीचा दर (रु.)
२०२५ - ५०,००,०००
२०२० - ३०,००,०००
२०१५ - २०,००,०००
२०१० - १०,००,०००
२००५ - २,२०,०००
२००० - १,८०,०००
१९९७ - १,६०,०००
१९९२ - १,००,०००
१९८७ - ४०,०००
१९८२ - ३०,०००
अधिक वाचा: शेतकऱ्यांसाठी पिक विम्याचे पैसे वाटपाचा फॉर्म्युला कसा? जाणून घ्या सविस्तर