नांदेड जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि सुसाट वादळी वाऱ्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे आधीच्या नुकसानीचे पंचनामे प्रलंबित आहेत, तर दुसरीकडे नव्या पावसाने शेतकरी अधिकच्या चिंतेत सापडले आहेत. जिल्ह्यातील कंधार, मुखेड, लोहा, किनवट, देगलूर आणि हदगाव तालुक्यांत अवकाळी पावसाची नोंद झाली.
पावसाचे प्रमाण अत्यल्प असले तरी वाऱ्याचा वेग प्रचंड होता. कापणीला आलेला गहू आडवा झाला. कापून ठेवलेल्या हरभऱ्याच्या गंजी उडून गेल्या. अनेक ठिकाणी शेतात काढलेला हरभरा वाऱ्यामुळे विखुरला. आंब्याचा मोहोर मोठ्या प्रमाणात गळून पडल्याने बागायतदारांचे नुकसान झाले आहे.
केळीची झाडे उन्मळून पडली, तर पपई बागांचीही हानी झाली आहे. यातून शेतकरी आणि बागायतदारांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत अद्याप स्पष्ट आदेश नसल्याची माहिती समोर येत आहे.
वरिष्ठांनी अहवाल पाठविण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी प्रत्यक्ष स्थळ पाहणी न करता कार्यालयीन पातळीवर प्राथमिक अहवाल सादर होत असल्याची चर्चा आहे. अवकाळी पावसाने थैमान घालून जवळपास आठवडा लोटला तरी अद्याप प्रशासन पंचनामे करण्यास बांधावर आले नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. मागील पिक अतिवृष्टीने तर यंदाचे पिक वादळाने हिरावले आहे.
शासनाकडून कधी मिळणार मदत?
• ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना तत्काळ आर्थिक अनुदान देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. वाढत्या उत्पादन खर्चामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही नैसर्गिक आपत्ती दुहेरी संकट ठरत आहे.
• पाऊस कमी झाला, पण वाऱ्याने सर्व काही उदध्वस्त केले. पंचनामे तरी लवकर व्हावेत, अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शासनाने तत्काळ प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे.
