अलिबाग : तालुक्यातील कार्ले, खंडाळा, आणि आसपासच्या परिसरात उत्पादित होणाऱ्या प्रसिद्ध पांढऱ्या कांद्याच्या काढणीला यंदा विलंब झाला आहे.
साधारणपणे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणारी कांदाकाढणी लांबलेल्या पावसामुळे रखडली आहे. त्यामुळे हा कांदा थेट फेब्रुवारी महिन्यातच बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.
अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा चव, टिकाऊपणा, आणि दर्जासाठी राज्यभरात प्रसिद्ध आहे. पंधरा दिवस लागवड उशिरा दरवर्षी खरीप हंगामातील कापणी पूर्ण झाल्यानंतर साधारण आठ ते दहा दिवसांत कांद्याची लागवड केली जाते.
यंदा जिल्ह्यात पावसाने अपेक्षेपेक्षा जास्त काळ मुक्काम केल्याने शेतीच्या सर्वच कामांवर परिणाम झाला. विशेषतः कांदा लागवडीचा नियोजित कालावधी पुढे ढकलावा लागला.
साधारणपणे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणारी कांदा लागवड यावर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात करावी लागली. त्यामुळे कांद्याची लागवड जवळपास पंधरा दिवस उशिरा झाली.
काढणीच्या वेळापत्रकावर परिणाम
या विलंबाचा थेट परिणाम कांद्याच्या वाढीवर तसेच काढणीच्या वेळापत्रकावर झाला आहे. शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, यंदा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात, म्हणजेच २६ जानेवारीनंतरच कांदा काढणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे
प्रक्रियेला वेळ
◼️ कांदा काढणीनंतर त्याच्या माळी तयार करणे, वाळवण, प्रतवारी, आणि बाजारात पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही दिवस लागतात.
◼️ त्यामुळे जानेवारी अखेरीस काढणी सुरू झाली तरी प्रत्यक्षात हा पांढरा कांदा फेब्रुवारी महिन्यातच बाजारात उपलब्ध होईल, असे शेतकरी सांगत आहेत.
...तर पुन्हा परिणाम होणार
◼️ कांदा काढणीला झालेल्या विलंबामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होणार नसला, तरी बाजारपेठेतील वेळापत्रक मात्र बदलणार आहे.
◼️ काही शेतकऱ्यांच्या मते, बाजारात कांदा उशिरा दाखल झाल्यास सुरुवातीच्या काळात दर चांगले मिळण्याची शक्यता आहे.
◼️ हवामान पुन्हा प्रतिकूल ठरल्यास किंवा अचानक पावसाने हजेरी लावल्यास काढणी व साठवणुकीवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त होत आहे.
अलिबाग तालुक्यातील कार्ले परिसरातील पांढऱ्या कांद्याला चव आणि गुणधर्मामुळे विशेष मागणी असते. रायगड जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठांसह रत्नागिरी, नवी मुंबई, वाशी, मुंबई, आणि पुणे येथून या कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते. यंदा पांढरा कांदा बाजारात सुमारे पंधरा दिवस उशिरा दाखल होणार आहे. - सतीश म्हात्रे, पांढरा कांदा उत्पादक
अधिक वाचा: राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची होणार पुनर्रचना; नेमका कसा होणार फायदा? वाचा सविस्तर
