कोल्हापूर जिल्ह्याच्या वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात एका दिवसात १४ हजार १३६ मे.टन उसाचे विक्रमी गाळप करून कारखान्याच्या आजपर्यंतच्या इतिहासातील उच्चांकी गाळप झाल्याची माहिती अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे व कार्यकारी संचालक शहाजी भगत यांनी दिली.
वारणा कारखान्याचा गळीत हंगाम जोरात सुरू आहे. ५६ दिवसांत ६ लाख ५ हजार ८५१ मेट्रिक टनाचे गाळप करून ११.३८ साखर उताऱ्याने ६ लाख ५५ हजार साखर पोत्यांचे उत्पादन केले. आजपर्यंतच्या कारखान्याच्या इतिहासात एका दिवसात १४ हजार १३६ मे. टन उसाचे विक्रमी गाळप करून १६,१५० साखर पोत्यांचे उच्चांकी उत्पादन केले.
आमदार डॉ. विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी संचालक शहाजी भगत, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथील तज्ज्ञ मार्गदर्शक, तांत्रिक सल्लागार आर. एस. कुलकर्णी, चीफ इंजिनिअर अनंत पाटील, श्रीकांत पाटील, आनंद कुंभार, प्रमोद पाटील, गोकुळ धोमसे, संदीप खोत यांच्या सहकार्याने विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साथीने हे यश मिळत आहे.
मार्चमध्ये गळितास येणाऱ्या उसास प्रतिटन २०० जादा दर देण्याचे जाहीर केलेले आहे, असे सांगत आमदार कोरे यांनी खातेप्रमुखांचा सत्कार केला. यावेळी उपाध्यक्ष प्रतापराव पाटील व संचालक मंडळ, सचिव बी. बी. दोशिंगे, विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.