करमाळा : तालुक्यातील पूर्व भागात रब्बी हंगामातील ज्वारीकाढणीला वेग आला आहे. मजुरी वाढल्याने शेतकरी सावड करून शेतकऱ्यांनी ज्वारीकाढणीला सुरुवात केली आहे.
यावर्षी उशिरापर्यंत सतत पडलेल्या पावसामुळे ज्वारीची पेरणी लांबली होती. यामुळे ज्वारीचे पीक उशिरा काढणीला आले आहे.
दगडी व मालदांडी रब्बी ज्वारीचे कोठार समजल्या जाणाऱ्या करमाळा तालुक्यातील पूर्व भागामध्ये ज्वारी पिकामध्ये प्रथमच घट होऊन गहू, हरभरा, मका, ऊस पिकामध्ये वाढ झाली आहे.
वर्षभर खाण्यासाठी लागणारी ज्वारी व जनावरांना खाद्य म्हणून लागणारा कडबा यासाठी ज्वारी हे महत्त्वाचे पीक असल्याने प्रत्येक शेतकरी घरी खाण्यापुरती का होईना ज्वारीचे पीक घेतोच.
दरम्यान, यंदा पावसाळा लांबल्याने ज्वारीची उशिरा पेरणी झाली. आता ज्वारीचे पीक काढणीला आले असून, शेतकरी ज्वारी काढणीला लागला आहे. सध्या वातावरण बदलामुळे शेती पिक काढणीला वेग आला आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या पावसाच्या इशाऱ्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. हाताशी आलेले पीक पुन्हा जाईल या भीतीत शेतकरी जगत आहे.
मजुरीचे दर परवडेनात
◼️ ज्वारी काढणीच्या मजुरीमध्ये वाढ झाली आहे.
◼️ पुरुष मजुरास दिवसाकाठी आठशे रुपये, तर महिला मजुरास पाचशे रुपये मोजावे लागत आहेत.
◼️ सर्वसामान्य शेतकऱ्यांना ते मजुरीचे दर परवडत नाहीत.
◼️ यामुळे शेतकरी शेजाऱ्यांना बरोबर घेऊन सावड करून ज्वारी काढणीला लागला आहे.
◼️ एकमेकांची ज्वारी सावड करून काढण्यास शेतकरी प्राधान्य देत आहेत.
◼️ यामुळे ज्वारी काढण्याच्या मजुरीमध्ये बचत होत आहे.
ज्वारी काढणीसाठी जोडीला चौदाशे रुपये मजुरी घेऊ लागला आहे. वाढत्या मजुरीमुळे ज्वारीचे पीक परवडत नाही. त्यामुळे सावड करून ज्वारी काढणे एकमेव पर्याय आहे. - इनुस मुजावर, शेतकरी पांडे
अधिक वाचा: गुढीपाडव्यापासून पुढील तीन दिवस वातावरणात बदल; राज्यात 'या' जिल्ह्यांत गारपिटीचा इशारा
