गेल्या काही दिवसांपासून वर्तवण्यात आलेला अवकाळी पावसाचा अंदाज अखेर खरा ठरला असून, बुधवारी सायंकाळी धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील अनेक भागांना वादळी पावसाने झोडपून काढले.
तालुक्यातील नांदवन शेतशिवारात तब्बल एक तास झालेल्या पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले. बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला.
विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार एन्ट्री केल्याने ग्रामस्थांची व शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. नांदवन परिसरात पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, शेतात काढून ठेवलेला आणि उभा असलेला कांदा पाण्यात भिजला.
यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती शेतकरी सिकंदर अहिरे व चेतन पाटील यांनी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसामुळे हिरावला जातो की काय, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. ढगाळ हवामान अजूनही कायम असल्याने काढणीला वेग आला असला तरी, पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाने या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
रब्बी हंगामातील पिके गहू, हरभरा पिकांचेही नुकसान
सध्या रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या पिकांच्या काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. अनेक ठिकाणी ही पिके काढणीसाठी तयार आहेत, तर काही ठिकाणी मळणीची कामे सुरू आहेत. अशा स्थितीत आलेल्या पावसामुळे गहू व हरभरा काढणीला आलेली पिके भिजल्याने दाण्यांचा दर्जा खराब होण्याची शक्यता आहे.
नांदवण परिसरात तासभर झाला वादळी पाऊस
• तालुक्यातील नांदवण परिसराला अवकाळीचा मोठा तडका बसला. सुमारे तासभर झालेल्या पावसामुळे परिसरातील कांदा पिकाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. ज्यामुळे परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला.
• शेतात साठवून ठेवलेला माल सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकरी ताडपत्रीचा आधार घेत असून, पावसापासून पीक वाचवण्यासाठी मोठी धडपड सुरू होती.
