बालाजी बिराजदार
धाराशिव जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातील मोघा (खुर्द) येथील शेतकरी कृष्णा पाटील यांना अवकाळी पावसामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. पाटील यांनी आपल्या शेतातील दीड एकर क्षेत्रावर टरबुजाची लागवड केली होती. परंतु ऐन काढणीच्या वेळेस अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे संपूर्ण टरबुजची पाण्यातच नासाडी झाली आहे. यामुळे त्यांना दीड लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून लोहारा शहरासह तालुक्यात दररोज अवकाळी पावसाची हजेरी आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या उमेदीची फळबाग, भाजीपाल्याची पिके जमीनदोस्त झाली आहेत. तर कृष्णा पाटील यांनी दीड एकर क्षेत्रावर लावलेल्या टरबुज पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतकरी कृष्णा पाटील यांना टरबुज पिकासाठी २५ हजार रुपये रोपांसाठी, लागवडीसाठी दहा हजार रुपये, औषध-फवारणीसाठी ५० हजार रुपये असा एकूण ८५ हजार रुपये खर्च झाला होता. तर काही दिवसांत टरबुज विक्रीसाठी येणार होते, मात्र त्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान, एक-दोन दिवस पाऊस पडेल असे वाटत असताना गेले आठ ते दहा दिवसांपासून पाऊस सुरूच आहे. त्यामुळे दीड एकरवरील टरबुज जागेवरच सडले आहे.
या सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्येही चिंता पसरली आहे. हवामानातील बदल, अनिश्चित पर्जन्यमान आणि सरकारकडून वेळेवर मदत न मिळाल्यास शेतकरी वर्गाचे आर्थिक व मानसिक आरोग्य डगमगण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रानावर टरबुज सडून नुकसान झाल्याची माहिती तलाठी यांना दिली. मात्र तलाठी यांनी पंचनामा करण्याचे आदेशच जिल्हाधिकारी यांच्याकडून आले नाहीत. आदेश आल्यावर पंचनामा करू, असे सांगितले. – कृष्णा पाटील, शेतकरी, मोघा (खुर्द).
'या' शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान
• मोघा (खुर्द) येथील शेतकरी संतोष गोरे यांनी अर्धा एकरवर टोमॅटो लावले होते. या सततच्या पावसामुळे त्यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
• शेतकरी सुनील भोंडवे यांनी अर्धा एकरवर भेंडी लावली होती. याचेही ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
• तर पंचय्या स्वामी यांनी तीन एकर ऊसात उडीद पट्टा पद्धतीने लागवड केली होती. त्यात काढणीस आलेल्या उडीदाचे पावसामुळे आर्थिक नुकसान झाले आहे.