मराठवाड्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे १३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस व गारपिटीमुळे काढणीला आलेल्या सुमारे ७ हजार हेक्टरवरील गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले आहे.
हरभरा, मका, बाजरी यासह आंबा, मोसंबी फळबागांनाही फटका बसला आहे. अंदाजे २२ हजार शेतकऱ्यांचे नुकसान विभागात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. राज्यात १७ ते २२ मार्चदरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती.
अवकाळी पावसात पडलेल्या विजांमुळे विभागात दोघांचा मृत्यू झाला, तर ४१ लहान - मोठी जनावरे दगावली. ५३३ गावांतील सुमारे २२ हजार शेतकरी बाधित झाले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानात ३,३९७ हेक्टर जिरायत, ६,९४४ बागायत, तर १,२२९ हेक्टर फळबागांचा समावेश आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे विभागातील तापमान कमी झाले होते. रविवारपासून पुन्हा तापमानाचा पारा वाढू लागला आहे.
दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यामध्ये देखील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळीने शेतशिवारातील गव्हाचे पीक आडवे झाले. हातातोंडाशी आलेला घासाची नासाडी बघून शेतकरी मात्र मोठ्या चिंतेत आहे.
