केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान (National Mission in Natural Farming) (NMNF) या केंद्र पुरस्कृत योजनेस मान्यता दिली.
केंद्र शासनाने महाराष्ट्रामध्ये सदर योजना राबविण्याची विनंती केली. केंद्र शासनाने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान या योजनेचे मार्गदर्शक तत्वे निगर्मित केली आहेत.
अभियानाची मुख्य उद्दीष्टे
◼️ निसर्गावर आधारित शाश्वत शेती प्रणालीला प्रोत्साहन देणे.
◼️ शेतावर तयार केलेल्या नैसर्गिक निविष्ठांचा वापर करणे.
◼️ बाहेरून निविष्ठा खरेदीवरील अवलंबित्व कमी करणे व निविष्ठावरील खर्च कमी करणे.
◼️ जमिनीचे आरोग्य सुधारणे.
◼️ पशुधन (शक्यतो गायींची स्थानिक जात) एकात्मिक कृषी पद्धती लोकप्रिय करणे.
◼️ नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतावरील अनुभवाचा उपयोग करून घेणे आणि नैसर्गिक शेतीच्या स्थानिक पद्धती विकसित करणे.
◼️ रसायनमुक्त नैसर्गिक शेतमालासाठी एकच एक राष्ट्रीय बँड तयार करणे.
योजनेची अंमलबजावणी कशी?
◼️ अभियाना अंतर्गत प्रति शेतकरी १ एकर मर्यादेत लाभ देय आहे.
◼️ १-३ ग्रामपंचायतीमधील ५० हेक्टर क्षेत्र, १२५ शेतकऱ्यांचा गट स्थापन करणे.
◼️ कृषी सखी (सामुदायिक संसाधन व्यक्ती-CRP) यांचे मार्फत अभियानाचा विस्तार करणे.
◼️ ग्रामपंचायत मध्ये जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम घेणे.
◼️ नैसर्गिक शेतीसाठी तयार निविष्ठा उपलब्ध करण्यासाठी गरजेवर आधारित ३ गटांमागे २ जैव निविष्ठा संसाधन केंद्र (BRC) स्थापन करणे.
◼️ कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठे व स्थानिक नैसर्गिक शेती संस्था यांनी आपल्या प्रक्षेत्रावर व शेतकऱ्यांच्या शेतावर मॉडेल प्रात्यक्षिक फार्म विकसीत करणे.
◼️ शास्त्रीय पध्दतीने प्रमाणिकरण करण्यासाठी मदत करणे इत्यादी.
योजना कशी राबवली जाणार?
◼️ सन २०२५-१६ पासून १७०९ गट स्थापन करुन योजनेची अंमलबजाणी करावयाची आहे.
◼️ सदर अभियान गट आधारीत असून ५० हेक्टर क्षेत्राचा एक गट, एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त १ एकर लाभद्यावयाचा असून त्यानुसार प्रति गट १२५ शेतकरी असणार आहेत.
◼️ याप्रमाणे १७०९ गटांचे ८५,४५० हे. क्षेत्र व २,१३,६२५ लाभार्थी निवड करण्यासाठी आणि ११३९ जैव निविष्ठा संसाधन केंद्र (BRC) स्थापन करणे.
◼️ याकरिता रु. २५५.४५ कोटी तरतूदीस राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाच्या राज्यस्तरीय कार्यकारी समितीने मंजूरी दिली आहे.
◼️ राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंमलबजावणीसाठी शेतकरी प्रशिक्षण व कृषी सखी प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी तसेच नैसर्गिक शेती मॉडेल प्रात्यक्षिक फार्म विकसीत करण्यासाठी प्रशिक्षण संस्थांना केंद्र शासनाकडून १०० टक्के निधी प्राप्त होणार आहे.
◼️ राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियाना अंतर्गत एकदा निवड केलेल्या गट/लाभार्थीस २ वर्षे लाभ द्यावयाचा आहे.
◼️ त्यामुळे १७०९ गट स्थापन करुन योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी योजनेच्या २ वर्षांच्या कृती आराखड्यास प्रशासकिय मान्यता दिली आहे.
राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान National Mission in Natural Farming (NMNF) ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यातील १७०९ गावसमुहात (cluster) ८५,४५० हे. क्षेत्रात ११३९ जैवनिविष्ठा स्रोत केंद्र (Bio Input Resource Centers) सह, केंद्र शासनाने विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वांआधारे, राबविण्यास या शासन निर्णयाव्दारे मान्यता देण्यात आली आहे.
राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान (National Mission on Natural Farming) (NMNF) या केंद्र पुरस्कृत योजनेस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत अधिक माहितीसाठी शासन निर्णय पहा.
अधिक वाचा: ठिबक व तुषार सिंचन तसेच वैयक्तिक शेततळे योजनेसाठी ५०० कोटी खर्चास शासनाची मान्यता