रेशनकार्डधारकांसाठी सरकारने मोठा दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. यानुसार कार्डधारकांना एकाच महिन्यात तिप्पट धान्य देण्यात येणार आहे.
एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य एप्रिलमध्येच वितरित करण्यात येणार आहे. पुढील दोन महिने धान्य घेण्यासाठी रेशन दुकानदारांकडे जाण्याची गरज भासणार नाही.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना याचा मोठा फायदा होणार आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, धान्य वाटपाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी सर्व रेशन दुकानदारांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कशामुळे घेतला शासनाने हा निर्णय...
कडक उन्हात नागरिकांना वारंवार रेशन दुकानांवर जावे लागू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील लाभार्थ्यांना उन्हातान्हात होणारा त्रास टाळण्यासाठी हा उपाय केला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात तीन लाख ७५ हजार रेशनकार्डधारक
• लाभार्थ्यांना वारंवार रेशन दुकानात जाण्याची गरज भासणार नाही. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. जिल्ह्यात तीन लाख ७५ हजार रेशनकार्डधारक आहेत. एकूण युनिटची संख्या १४ लाख ८८ हजार ६९७ इतकी आहे.
• प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती, प्रति महिना पाच किलो धान्य दिले जाते. त्यामुळे तीन महिन्यांसाठी एकूण १५ किलो प्रति व्यक्ती धान्य मिळणार आहे. अंत्योदय लाभार्थ्यांना प्रति कुटुंब प्रति महिना ३५ किलो धान्य दिले जाते.
• त्यामुळे तीन महिन्यांसाठी एकूण १०५ किलो प्रति कुटुंब धान्य मिळणार आहे. यामध्ये तांदूळ आणि गहू यांचा समावेश असतो.
या रेशनकार्डाना मिळणार लाभ...
• यामध्ये अंत्योदय अन्न योजनेंतर्गत येणारी अत्यंत गरीब कुटुंब, तसेच प्राधान्य गट यामधील लाभार्थी यांचा समावेश आहे. या दोन्ही गटांतील नागरिकांना एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य एप्रिल महिन्यातच दिले जाणार आहे.
• एप्रिल महिन्यातच तीन महिन्यांचे धान्य वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी बायोमेट्रिक पडताळणी सक्तीची करण्यात आली असून, पात्र लाभार्थ्यांनी वेळेत धान्य उचलावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
