यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील कायर व घोन्सा येथे नियमित आठवड्यातून एकदा बैलबाजार भरतो, तर वणी येथे होळीनंतर यात्रेदरम्यान बैलबाजार भरतो.
यामध्ये यात्रेदरम्यान, वणीत भरणारा जनावरांचा बाजार विदर्भात प्रसिद्ध आहे. काही शेतकरीशेतीसाठी यंत्रांचा वापर करतात, तर काही शेतकरी अजूनही बैलाद्वारे शेती कसतात.
सध्या बाजारात दर्जेदार बैलजोड्यांचे दर दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. वाढत्या चाऱ्याच्या वाढलेल्या किमती, चाराटंचाई व देखभाल खर्चामुळे पारंपरिक शेतीत वापरले जाणारे बैल शेतकऱ्यांना परवडेनासे झालेत. त्यामुळे ट्रॅक्टरकडे कल वाढला आहे.
तसेच अनेक शेतकरी ट्रॅक्टरद्वारेच शेताची मशागत करण्याकडे भर देत आहे. बदलते हवामान, शेती खर्चात वाढ आणि यांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टरकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे हळूहळू गोधनाची संख्याही झपाट्याने घटत चालली आहे. ही चिंतेची बाब मानली जात आहे.
मजुरांपेक्षा कमी खर्च
बैलजोडीच्या तुलनेत ट्रॅक्टर हे अधिक टिकाऊ, कमी देखभाल खर्चाचे आणि वेळ वाचविणारे साधन ठरत आहे. विशेषतः मध्यम व ज्यांच्याकडे शेती अधिक आहे, असे शेतकरी ट्रॅक्टरची खरेदी करताना दिसून येत आहेत. कामाच्या वेळी लागणाऱ्या मजुरीचा खर्चही ट्रॅक्टरमुळे कमी होतो.
ट्रॅक्टर खरेदीसाठी अनेक पर्याय झाले उपलब्ध
बाजारात अनेक ट्रॅक्टर कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. शून्य डाऊनपेमेंट, हप्ता योजनेसारखे पर्याय उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल ट्रॅक्टरकडे वाढतो आहे. काही शेतकरी बैल विकून त्याच पैशांतून ट्रॅक्टरची आगाऊ रक्कम भरत आहेत.
५० चाऱ्याची पेंडी ५० रुपयांना एक
सध्या चाऱ्याचे दर वाढले असून एक कडबा पेंडी सरासरी ५० रुपयांना मिळत आहे. उन्हाळ्याच्या मोसमात स्थानिक पातळीवर चारा उत्पादन घटल्याने चाऱ्याची टंचाई भासत आहे. परिणामी, बैलांचे संगोपन करणे कठीण झाले आहे.
कायर, घोन्सा येथे बैलांचा सर्वात मोठा बाजार
• वणी तालुक्यातील कायर व घोन्सा येथे बैलबाजार भरतो. कायर येथे गुरुवारी, तर घोन्सा येथे शुक्रवारी बैलबाजार भरतो. या बैलबाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर बैल खरेदी-विक्रीचे व्यवहार होता.
• या बाजारात शेकडोच्या संख्येने शेतकरी आणि व्यापारी सहभागी होतात. या बैल बाजारात पांढरकवडा उपविभागातील झरी, वणी उपविभागातील मारेगाव व वणी तालुक्यातील शेतकरी खरेदी-विक्रीसाठी मोठ्या संख्येने जातात.
शेती पद्धतीही बदलतेय
उत्पादन खर्च आणि पिकाला बाजारात मिळणारा भाव यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे शेतीतील खर्च कमी करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. यातून गटशेती, समूहशेती तसेच ठराविक बाजारपेठेत समूहाने माल विक्रीसाठी पाठविण्यासाठीही शेतकरी पुढाकार घेत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होत आहे.
हेही वाचा : खरीप हंगामापूर्वी 'हे' एक काम करा अन् यंदा खतांचा अतिरिक्त खर्च टाळा