Join us

भात शेतीत पारंपारिक धूळपेरणी तंत्र छोट्या शेतकऱ्यांना ठरतंय फायदेशीर; जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 09:32 IST

dhul perani मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या पेरण्या पूर्ण होतात म्हणजेच रोहिणी नक्षत्रात यानंतर मिरगाच्या (मृगाच्या) पावसाची वाट पाहिली जाते. हळूहळू पेरलेली दाढ (भात) त्याला कोंब येतात. त्याची छोटी छोटी रोपे (तरू) तयार होते.

चला जाऊ या धूळपेरणीला ! असो बरकत धूळपेरणीलालागला मातीचा जीव झुरणीला ! हिरव्या पिसांचा ध्यास धरणीलाटिपूर मोत्यांची आस मोरणीला

अर्धा मे महिना संपत आला होता. यात वाडीवाडीच्या गावपूजांचे कार्यक्रम आणि त्याला जोड म्हणून नमन, भजनाची डबलबारी, नाटके यांची नुसती रेलचेल चाललेली होती. त्यात मे महिन्याच्या तिसरा आठवडा केव्हा गेला ते कळलेसुद्धा नाही.

चार दिवस चाकरमान्यांबरोबर आनंदात घालवलेल्या कोकणी शेतकऱ्याला आपल्या खरीतल्या, बावळीतल्या, मळ्यातल्या शेताची आठवण झाली. त्यात आकाशात काळे काळे ढग पळताना दिसू लागले होते. म्हणजेच पावसाळ्याची चाहूल लागली होती.

या आमच्या शेतकरी दादांनी कवळ तोडून, जमीन भाजून, मशागत करून, जमीन पेरणीसाठी स्वच्छ साफसूफ करून ठेवलेली आहे. ते वाट बघत आहेत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्याची.

कारण मे महिन्याच्या कडक उन्हात जमीन तापलेली असते. जमिनीला चांगली ऊब आलेली असते. त्यात थोड्याशा पावसाने शिडकावा केला की, हे आमचे शेतकरी दादा पूर्वीच्या काळी जोताने म्हणजेच औताने नांगरणी करायचे.

आता मात्र सर्वत्र छोटे नांगरणीचे ट्रॅक्टर आले आहेत. नांगरणी केल्यावर त्याला चांगले दोन-तीन दिवस कडक ऊन लागलं की, चांगला मुहूर्त बघून भाताची पेरणी करतात. यालाच धूळपेरणी (धुरळेवाफ) असे म्हणतात.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या पेरण्या पूर्ण होतात म्हणजेच रोहिणी नक्षत्रात यानंतर मिरगाच्या (मृगाच्या) पावसाची वाट पाहिली जाते. हळूहळू पेरलेली दाढ (भात) त्याला कोंब येतात. त्याची छोटी छोटी रोपे (तरू) तयार होते.

त्याची काढणी केली जाते व पुन्हा त्यांची चिखलात लावणी केली जाते आणि मग पुन्हा शेतीच्या कामांना सुरुवात होते. भातपेरणीच्या निमित्ताने जी पायाला, अंगाला, कपड्यांना धूळ, माती, चिखल लागतो.

ती धूळ म्हणजेच 'शेती हा देशाचा कणा व प्रगतीचा पाया आहे' याची जाणीव करून देतात. या धूळपेरणीच्या निमित्ताने त्या कष्टाची जाणीव होणे हे महत्त्वाचे आहे. ज्याला या कष्टाची जाणीव झाली तो कधीच या शेतकऱ्याला कधीच विसरणार नाही.

धूळपेरणी म्हणजे बियाणे मातीमध्ये मिसळून पेरण्याची पद्धत जी विशेषतः पाऊस येण्यापूर्वी केली जाते. यात बियाणे मातीमध्ये मिसळून त्यावर मातीचा थर दिला जातो. नंतर फळी फिरवली जाते.

या धूळपेरणीच्या निमित्ताने आपण सर्वांनी अनुभव घ्यावा व त्यातील आनंद अनुभवावा मग काय? आपला ताण तणाव कुठल्या कुठे निघून जाईल.

शेतातील माती कपाळाला लावून धन्यता मानावी. म्हणजे आपला देश कृषी प्रधान असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटेला तर मग चला जाऊया धूळपेरणीला..

धूळपेरणी म्हणजे काय?खरीतील, तळीतील, वाफ्यातील, मळ्यातील जमीन थोड्याशा ओलाव्यावर नांगरली जाते. त्याला कडक ऊन लागले की, ती ढिकळ आलेली असते ती कुदळ, फावडे किंवा ढेकळ्याने फोडली जातात. त्यामुळे अशी माती पिठूळलेली होते. तिची बारीक बारीक माती होते. त्यातून हात जरी फिरवला तरी सर्रकन खाली पडते. म्हणजे या मातीची बारीक धूळ होते. त्यात भाताचे धान्य पेरले की, त्याला चांगली ऊब लागते त्यावर थोडासा जरी पाऊस पडला तरी त्याला चांगले कोंब येतात. मातीच्या धुळीत पेरणी केली जाते म्हणून याला 'धूळपेरणी' म्हणतात.

- राजेंद्र जयवंत रांगणकरगणेशगुळे, रत्नागिरी

टॅग्स :भातपेरणीशेतकरीशेतीपीककोकणपाऊसलागवड, मशागत