आंबा कमी आला तर बागायतदार संकटात सापडतात आणि आंबा अधिक आला तर दर कमी मिळत असल्याने बागायतदार संकटात सापडतात. कुठलीही स्थिती असली तरी बागायतदार नाखूश असतात, असा सूर अनेकजण लावतात. अर्थात बागायतदारांच्या या व्यथा फक्त शेतकऱ्यांनाच नीट समजू शकतात.
आंबा नाशवंत असल्याने तो पिकण्याआधीच बाजारात जावा लागतो. अधिक पीक आले तरी साठवून ठेवता येत नाही. अशावेळी मिळेल तो दर स्वीकारून आंब्याची विक्री करावी लागते. गेली सुमारे १५ वर्षे हवामानात सातत्याने बदल होत आहेत. त्याचा खूप मोठा परिणाम आंबा उत्पादनावर होतो. म्हणूनच हा व्यवसाय आता आतबट्ट्याचा झाला आहे.
हवामानातील बदलानंतरही आंबा पीक टिकून राहावे, यासाठी सातत्याने फवारण्या कराव्या लागतात. त्यातही कीड रोगाबाबत अजूनही औषधे सापडत नसल्याने फवारण्यांचे प्रमाण वाढते. कीटकनाशके, तसेच खते यांचे दर प्रचंड वाढले आहेत. फवारण्यांचे प्रमाण वाढल्याने हा खर्च सातत्याने वाढतो.
अशावेळी समाधानकारक उत्पादन नसले तर हा खर्च वसूल होण्याइतके उत्पादनही हाताशी येत नाही. सरकारने नुकसानभरपाई देण्याऐवजी खते आणि कीटकनाशकांच्या वाढत्या किमतीवर मर्यादा आणावी, अशी अपेक्षाही बागायतदार वर्षानुवर्षे करीत आहेत. एकीकडे हे दुष्टचक्र सुरू असताना यंदा मात्र काहीशी सुखावह स्थिती आता तरी आंब्याच्या बागांमधून दिसत आहे.
पावसाळा उशिरापर्यंत सुरू असल्याने नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या थंडीने डिसेंबर महिन्यात आगमन केले. मात्र, डिसेंबर महिना आणि जानेवारीचा अर्धा महिना थंडीचे प्रमाण चांगले होते. त्यामुळे आंब्याची कलमे चांगली मोहोरली आहेत. आवश्यक फवारण्या करून बागायतदार मोहोराची काळजीही घेत आहेत.
दृष्टचक्रातून सुखावह हंगाम
• गेली काही वर्षे विशेषतः २००९ मध्ये आलेल्या फयान वादळानंतर हवामानातील बदलांचा वेग वाढला आहे. त्यामुळे दरवर्षीच आंबा पिकातून फायदा होणे लांबच, पण त्यातून मूळ खर्च निघणेही मुश्कील झाले आहे. म्हणूनच अनेकांनी आंबा बागायतीवरील आपला भर कमी आला आहे. बागा कराराने देणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
• एकीकडे हे दुष्टचक्र सुरू असताना यंदा मात्र काहीशी सुखावह स्थिती आता तरी आंब्याच्या बागांमधून दिसत आहे. पावसाळा उशिरापर्यंत सुरू असल्याने नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या थंडीने डिसेंबर महिन्यात आगमन केले. मात्र, डिसेंबर महिना आणि जानेवारीचा अर्धा महिना थंडीचे प्रमाण चांगले होते. त्यामुळे आंब्याची कलमे चांगली मोहोरली आहेत. आवश्यक फवारण्या करून बागायतदार मोहोराची काळजीही घेत आहेत.
वातावरणातील संथ बदल फायदेशीर
• सर्वसाधारणपणे मकर संक्रांतीनंतर थंडीचे प्रमाण कमी होते आणि उन्हाळा जाणवू लागतो. तेच हवामान आता अनुभवास येत आहे. थंडी थोडी कमी झाली आहे. आंब्याच्या वाढीसाठी हे वातावरण अत्यंत पोषक आहे. असेच टप्प्याटप्याने बदल होणे अपेक्षित आहे.
• अचानक झालेला बदल किंवा पुन्हा थंडीचे प्रमाण वाढणे आता धोकादायक ठरू शकते. आता होत आहेत तर बदल संथपणे झाले तर यंदा हापूसला आणि पर्यायाने बागायतदारांना अच्छे दिन येतील, यात शंका नाही.
मनोज मुळ्ये
मुख्य उपसंपादक, रत्नागिरी.
हेही वाचा : कडधान्य खाण्याची सुद्धा असते योग्य पद्धत! जाणून घ्या याच गुणकारी पद्धतीविषयी अधिक माहिती
