दत्ता लोकरे
सरवडे : कृत्रिम बुद्धिमतेचा (एआय) वापर करून मजरे कासारवाडा (ता. राधानगरी) येथील युवराज वारके यांनी ऊसशेती फुलवली आहे.
कमी खर्चात ऊसपीक जोमात आले असून किमान यातून एकरी शंभर टन ऊस उत्पादनाची अपेक्षा त्यांना आहे. सर्वच क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.
बारामतीच्या कृषी विकास केंद्राच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा करून कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या ऊस शेतीचा अवलंब केला आहे.
वारके यांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून यापूर्वी केळी, भात, भुईमुगाचे भरघोस पीक घेतले आहे. एआयचा वापर करून दीड एकर क्षेत्रात ऊस पीक घेतले आहे.
पाडेगाव येथून ८६०३२ जातीच्या उसाचे बी आणून त्याची रोपे तयार केली. सध्या उसाची जोमात वाढ झाली आहे.
विभागीय कृषी सहसंचालक अजय कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक जालिंदर पांगरे, उपसंचालक नामदेव परीट, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, तालुका कृषी अधिकारी रमेश गायकवाड यांनी ऊस शेतीची पाहणी केली.
तसेच ऊस तज्ज्ञ संजीव माने-पाटील, मंडल कृषी अधिकारी दिलीप आदमापुरे, कृषी पर्यवेक्षक कल्याण कोंडे, युवराज सावंत, ओमकार गुरव यांनी भेट देऊन ऊस शेतीची पाहणी केली.
ही मिळते माहिती..
- हवामानाचा अंदाज कळतो.
- जमिनीत पाण्याचे प्रमाण किती आहे, तेही समजते.
- आगामी दूषित वातावरणाची सूचना व औषध फवारणी याबाबत सूचना देते.
तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय शेती किफायतशीर होणार नाही. उसाचे घटलेले उत्पादन पाहता 'एआय' तंत्रज्ञान त्यावर चांगला पर्याय आहे. - युवराज वारके, माजी संचालक, बिद्री साखर कारखाना
अधिक वाचा: सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून १,४३५ शेतकरी बनले उद्योगपती; हा जिल्हा राज्यात अग्रेसर