अहिल्यानगर : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत अनुदान वितरणात अहिल्यानगर जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात यावर्षी ५०१ अन्न प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत.
बालेवाडी (पुणे) येथे बुधवारी (दि.९) राज्यस्तरीय कृषी अधिकारी कार्यशाळेप्रसंगी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी पुरस्कार स्वीकारला.
याप्रसंगी प्रधान सचिव विकास रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक विनयकुमार आवटे आदी उपस्थित होते.
अहिल्यानगर जिल्ह्यात या योजनेंतर्गत यावर्षी ५०१ अन्न प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत. तीन वर्षात ही संख्या १४३५ वर पोहोचली आहे.
यामध्ये दुग्धजन्य पदार्थांच्या ३९०, फळे व भाजीपाला प्रक्रियेच्या ४२७, कडधान्य प्रक्रियेच्या १३०, पशुखाद्य प्रक्रियेच्या ७१, तेलबिया प्रक्रियेच्या ५५, बेकरी प्रक्रियेच्या ५५ तसेच इतर विविध प्रक्रिया उद्योगांचा समावेश आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व बँका, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक, जिल्हा संसाधन व्यक्तींनी एक संघभावनेने उत्कृष्ट काम केले.
याच कामाची पावती मिळाली असून, अहिल्यानगर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असल्याचे जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले.
जिल्ह्यात ९० कोटी रुपयांचे अनुदान वितरित
◼️ प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत लाभार्थ्यांसाठी प्रतिप्रकल्प कर्ज ११ लाख रुपये व ६ लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यात २० कोटी रुपयांचे अनुदान अन्न प्रक्रिया उद्योगांना वितरित झाले आहे.
◼️ यावर्षीही जास्तीत जास्त शेतकरी लाभार्थ्यांना योजनेत सामावून पिकांची मूल्यसाखळी विकासासाठी काम करण्याच्या सूचना कृषी विभागास दिल्या आहेत, असे अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
अधिक वाचा: FSSAI License : अन्न प्रक्रिया व्यवसायासाठी ऑनलाईन परवाना कसा काढाल? वाचा सविस्तर