पुणे : कमाल जमीन धारणा कायद्यांतर्गत मिळालेल्या जमिनी आता वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरित करून विकणे शक्य होणार आहे. त्यासाठी जमिनीच्या रेडीरेकनर मूल्याच्या क्षेत्रानुसार ३० किंवा २५ टक्के रक्कम भरून ही विक्री करता येणार आहे.
मात्र, ही जमीन राज्य सरकारने ज्याला दिली आहे, त्याच्याच नावावर किंवा परवानगी घेऊन दुसऱ्याच्या नावावर केलेली असावी. सरकारने या जमीन विक्रीबाबत हा दिलासादायक निर्णय घेतल्याने खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा झाला.
कमाल जमीन धारणा कायद्यानुसार, मर्यादेपेक्षा जास्त असलेली जमीन सरकारने ताब्यात घेऊन ती भूमिहीन शेतकरी, माजी सैनिक आणि गरजू व्यक्तींना वाटप केली होती. दौंड, बारामती, इंदापूर, शिरूर, खेड तालुक्यांमध्ये सीलिंगच्या जमिनींचे प्रमाण मोठे आहे.
काय आहे नवीन निर्णय?
◼️ पूर्वी सीलिंगच्या जमिनींची खरेदी-विक्री करताना ५० टक्के रक्कम भरून वर्ग २ या दर्जावरच विक्रीची परवानगी दिली जात असे.
◼️ मात्र, राज्य सरकारने आता काढलेल्या नवीन राजपत्रात या तरतुदीत बदल केला आहे.
◼️ ज्या शेतकऱ्यांना सीलिंगच्या जमिनींचे वाटप झाले होते आणि त्या जमिनी आजही त्यांच्याच नावावर आहेत किंवा त्यांनी रीतसर परवानगी घेऊन दुसऱ्याच्या नावावर केल्या आहेत, अशा जमिनी आता वर्ग १ भोगवटादार म्हणून नियमित होतील.
अधिक वाचा: लाईट गेल्यास फोन करायची कटकट आता मिटणार; महावितरण सुरु करतंय 'हा' नवीन स्मार्ट पर्याय
