वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर महावितरणच्या कार्यालयात फोन करून तक्रार नोंदविण्याची नागरिकांची कटकट आता कायमची मिटणार आहे.
एखाद्या भागात वीजपुरवठा खंडित झाला की, त्याची माहिती ग्राहकाला फोन न करताच थेट महावितरणच्या नियंत्रण कक्षाला स्मार्ट मीटरद्वारे मिळणार आहे. यासाठी महावितरणकडून एका विशेष सॉफ्टवेअरचे अद्यावतीकरणाचे काम वेगात सुरू झाले आहे.
अत्याधुनिक सेवा देण्यासाठी वीज वितरणकडून प्रयत्न केले जात आहेत. स्मार्ट मीटर बसविण्याचे काम गतीने सुरू आहे. या नवीन प्रणालीमुळे ग्राहकांना तक्रार आवश्यकता भासणार नाही. खंडित होण्याचा कालावधी कमी होईल.
स्मार्ट मीटरच महावितरणला कळवणार
नवीन तंत्रज्ञानानुसार, कोणत्याही घरचा किंवा परिसराचा वीजपुरवठा खंडित होताच, तेथील स्मार्ट मीटर स्वयंचलित प्रणालीद्वारे थेट महावितरणच्या मुख्य नियंत्रण कक्षाला वीज गेल्याचा संदेश पाठवेल.
विशेष सॉफ्टवेअर अद्ययावतीकरणाचे काम
या संपूर्ण प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि स्मार्ट मीटरकडून मिळणारे संदेश अचूकपणे टिपण्यासाठी महावितरण सध्या एका विशेष सॉफ्टवेअरचे अपडेशन करत आहे. हे सॉफ्टवेअर अद्ययावत झाल्यानंतर माहितीचे आदान-प्रदान अधिक वेगाने होईल.
वीज गेल्यास फोन करायची कटकट मिटणार
ग्रामीण भागात किंवा शहरात वीज खंडित झाल्यानंतर ग्राहकांची महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा स्थानिक कर्मचाऱ्यांना फोन करण्यासाठी एकच झुंबड उडते. मात्र, आता नवीन स्मार्ट मीटर यंत्रणेमुळे ग्राहकांना तक्रार करण्यासाठी फोन करण्याची गरजच उरणार नाही.
दर अर्ध्या तासाला नोंद
स्मार्ट मीटर हे केवळ वीज गेल्याची माहिती देणार नाही, तर ग्राहकाच्या वीज वापराची इत्यंभूत माहिती दर अर्ध्या तासाला महावितरणच्या यंत्रणेकडे नोंदवली जाईल.
टीओडीमुळे बिलात बचत
स्मार्ट मीटरच्या माध्यमातून ग्राहकांना 'टाइम ऑफ डे' (टीओडी) म्हणजेच दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेनुसार असणाऱ्या वीज दराचा लाभ घेता येणार आहे. ग्राहकांच्या मासिक बिलात मोठी बचत होण्यास मदत होईल.
अधिक वाचा: महिन्याला १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरताय? मग अवघ्या ५ हजारांतच मिळणार सोलर सिस्टीम
