स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट) योजनेत दारिद्र्यरेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरांवर अत्यल्प खर्चात एक किलोवॉट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवला जाणार आहे.
सुमारे २५ वर्षे मोफत वीज मिळवून देणाऱ्या या योजनेचा पात्र ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे महावितरणचे आवाहन आहे.
'स्मार्ट' योजनेत दारिद्रयरेषेखालील ग्राहकांना एक किलोवॅट सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून ३० हजार रुपये, तर राज्य सरकारकडून १७,५०० रुपये अनुदान मिळेल.
शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापर असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकांनाही केंद्र सरकारच्या ३० हजार रुपये अनुदानाखेरीज राज्य सरकारकडून अनुदान मिळणार आहे.
या गटातील सर्वसाधारण ग्राहकांना दहा हजार रुपये राज्य सरकारकडून मिळतील. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या ग्राहकांना राज्य सरकार १५ हजार रुपये अनुदान देणार आहे.
दारिद्रयरेषेखालील ग्राहकांना केवळ २५०० रुपये, शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापर असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्वसाधारण ग्राहकांना १० हजार रुपये, तर अनुसूचित जाती व जमातीतील ग्राहकांना ५ हजार रुपये हिस्सा भरायचा आहे.
उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान मिळणार असल्याने ग्राहकांचा मोठा फायदा होणार आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसोबत राबवल्या जाणाऱ्या या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेमुळे पाच लाख वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी पात्र महावितरणच्या वेबसाइटवर अर्ज करावा, महावितरणच्या संबंधित शाखा/उपविभाग कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
राज्यातील सुमारे दीड लाख दारिद्रयरेषेखालील तसेच साडेतीन लाख आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहक या योजनेस पात्र ठरणार आहेत.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' मिळणार
◼️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे.
◼️ त्यात ग्राहकांना छतावरील एक किलोवॉट सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी ३० हजार रुपये अनुदान केंद्र सरकारकडून मिळते.
◼️ 'स्मार्ट' योजनेत या अनुदानाखेरीज राज्य सरकारकडूनही अनुदान मिळणार असल्याने वीज ग्राहकांना खूप कभी हिस्सा भरून प्रकल्प बसवता येईल. ही योजना 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावर राबविण्यात येणार आहे.
ग्राहकांना दीर्घकालीन मोफत विजेचा लाभ मिळणार
◼️ महावितरणच्या माहितीनुसार, एक किलोवॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्पातून दरमहा सुमारे १२० युनिट वीजनिर्मिती होऊ शकते.
◼️ अतिरिक्त वीज महावितरणला विकून ग्राहकांना उत्पन्नाची संधी उपलब्ध होणार असून, सौर प्रकल्पाची कार्यक्षमता २५ वर्षे असल्याने दीर्घकालीन मोफत विजेचा लाभ मिळणार आहे.
◼️ या योजनेच्या लाभासाठी प्रथम येणाऱ्या अर्जदारांना प्राधान्य दिले जाणार आहे. आदिवासी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकांना विशेष प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अधिक वाचा: वारसदार नाही व मृत्युपत्रही नाही; मग कसे मिळवाल बँकेतील ठेवीचे पैसे? वाचा सविस्तर प्रक्रिया
