काकासाहेब खर्डे
धामोरी : थंडी सुरू झाली की जिभेवर हमखास रेंगाळणाऱ्या आंबट-गोड गावरान बोरांचा स्वाद आता दुर्मिळ झाला आहे.
शेतातील बांधावर असणाऱ्या गावरान बोरांच्या झाडांची संख्या घटत आहे. पौष्टिकतेत बोराला इतर फळाप्रमाणेच महत्त्व आहे. आरोग्यदायी फळ म्हणून त्याची गणना होते.
त्यामुळे अशी बोरं विक्रीस येण्याचे प्रमाण घटले आहे. आता नवीन वाणांच्या बोरांना शेतकरी प्राधान्य देतात, त्यामुळे हीच बोरं मोठ्या प्रमाणावर विक्रीस येत आहेत.
एकेकाळी शेताच्या बांधावर, ओढ्याला, नाल्यामध्ये, रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर बोरांची जाडी असायची. त्यामुळे कुठेही अगदी सहज गावरान बोरं खाण्यास मिळायची.
नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी असे तीन महिने बोरांचा सीजन असतो. पूर्वी बोरं घरी खाण्यासाठी ठेवून शेतकरीबाजारात विक्रीसाठी घेऊन जात असत. त्यामुळे गावरान बोरं विक्रीस येत असत.
शेतात होऊ लागलेल्या बदलानुसार, तसेच भावाभावांमध्ये शेतकऱ्यांच्या वाटण्या झाल्यावर क्षेत्र कमी होऊ लागल्याने शेतकरी शेतातील पिकावर पडणाऱ्या सावलीमुळे बांधावरील झाडे काढून टाकू लागले.
त्यातही मशागती करता बोरीचा काटा टोकदार असल्याने त्याचा त्रास अधिक होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंबा, जांभूळ, नारळ आदी फळझाडांच्या तुलनेत बांधावरील बोरींची झाडे काढण्यास प्राधान्य दिले.
त्यामुळे गावरान बोरांची झाडे अगदीच कमी झाली. ज्या शेतकऱ्यांकडे जास्त क्षेत्र आहे. त्यांनीच गावरान झाडे ठेवली आहेत. याशिवाय ही बोरं किडण्याचे प्रमाण अधिक आहे.
त्यामुळे झाडाची बरीचशी बोरं किडलेली निघतात. त्यामुळेही शेतकऱ्यांनी बोराची झाडे काढून टाकले आहेत. त्यामुळे बाजारात गावरानं बोर विक्रीस येण्याचे प्रमाण कमी झाले.
नवीन वाणांतून चांगले पैसे
◼️ अलीकडील काळात शेतकरी डाळिंब, द्राक्षे इतर फळाप्रमाणे बोरांकडेही उत्पन्नाचे पीक म्हणून पाहू लागले आहेत.
◼️ त्यामुळे शेतकरी नवीन वाणांच्या बोराची बाग लावू लागले आहेत. त्यातून चांगले पैसे मिळतात.
◼️ उमरान, बनारसी चमेली, अॅप्पल अशी बोरांची काही वाण प्रसिद्ध आहेत.
◼️ यातील काही वाणांना केवळ गोडीच आहेत.
◼️ या आंबटपणा फारसा आढळत नाही.
◼️ काही बोरं नुसती पिळाट लागतात. गावरान बोरांसारखे आंबट-गोडपणा यात फारसा नाही.
अधिक वाचा: थंडीच्या दिवसात आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर करतंय 'हे' एक फळ; जाणून घ्या सविस्तर
