संपूर्ण कोकणासाठी शासनाची फळपीक विमा योजना एक असली तरी प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी हप्त्याची रक्कम वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे. योजना एकच असली तरी हप्त्याची रक्कम वेगवेगळी कशी, असा प्रश्न बागायतदारांकडून केला जात आहे.
फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी सुरुवातीला दोन हेक्टर क्षेत्राची मर्यादा होती, बागायतदारांच्या मागणीनुसार ती चार हेक्टर करण्यात आली. योजनेसाठी बागायती क्षेत्रासाठी विमा संरक्षित रकमेचा एक हप्ता शेतकरी, एक हप्ता राज्य सरकार व एक हप्ता केंद्र शासनाकडून भरण्यात येतो.
रत्नागिरी जिल्ह्यासाठी हेक्टरी १३,६०० रुपये रक्कम यावर्षीसाठी निश्चित करण्यात आली होती. लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ८ हजार रुपये, तर पालघर जिल्ह्यासाठी २८ हजार रुपये रक्कम निश्चित करण्यात आली होती. प्रत्येक जिल्ह्यातील हवामान, आंबा उत्पादन भिन्न आहे; पण योजना एक असूनही विमा हप्त्याची रक्कम भिन्न का?
मानांकन एक
कोकणातील पाच जिल्ह्यांसाठी भौगोलिक मानांकन एकच जाहीर करत 'कोकण हापूस' असे एकच मानांकन देण्यात आले आहे. असे असताना, फळपीक विमा योजनेअंतर्गत हप्त्याची रक्कम कोकणातील पाचही जिल्ह्यांसाठी भिन्न ठेवण्यात आली आहे.
कमिटीला विश्वासात घ्या
शासनाकडून योजनेचे निकष ठरविताना, स्थानिक बागायतदारांना सहभागी करून घेणे आवश्यक आहे. आंबा हंगाम जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असतो, तर कंपन्यांकडून दि. १५ मेपर्यंत नुकसान ग्राह्य धरले जात आहे. आंबा झाडावर असताना, दि. १५ मेपर्यंतच निकष लागू होत आहेत. त्यामुळे नुकसान होत आहे.
वाटाण्याच्या अक्षता
बागायतदारांकडून दरवर्षी विमा कंपन्यांकडून निकष बदलण्याची मागणी केली जात आहे. मात्र, या मागणीला शासनाकडून वाटाण्याच्च्या अक्षता दाखविल्या जात आहेत. संततधार पाऊस, उच्चतम तापमान, नीचांक तापमानाची दखल घेत निकषात बदल करणे गरजेचे आहे.