मुंबई : भारतीयांच्या आहारात संपूर्ण तृणधान्यांचे प्रमाण गरजेपेक्षा अत्यंत कमी झाले असून, यामुळे देशात मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयविकारांसारख्या असंसर्गजन्य रोगांचा विळखा वेगाने वाढत आहे.
असा इशारा एका ताज्या शोधनिबंधातून देण्यात आला आहे. 'प्रोटीन फूड्स अँड न्यूट्रिशन डेव्हलपमेंट असोसिएशन ऑफ इंडिया' वआयटीसी यांच्या सहकार्याने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
'अपॉर्च्यूनिटीज विथ होल ग्रेन्स टू सपोर्ट मेटाबॉलिक हेल्थ अमंग इंडियन्स' या शीर्षकाखाली हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
पोषक तत्त्वांचा अभाव
◼️ भारतात बाजरी, ज्वारी, नाचणी यांसारख्या २० पेक्षा जास्त प्रकारच्या तृणधान्यांच्या जाती उपलब्ध आहेत.
◼️ असे असूनही, प्रक्रिया केलेल्या पदार्थांकडे वाढत्या कलामुळे अन्नातील अत्यावश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे नष्ट होत आहेत.
◼️ धान्य प्रक्रिया करताना त्यातील कोंडा काढला जातो, ज्यामुळे त्यातील महत्त्वाचे घटक निघून जातात.
१२५ ग्रॅम तृणधान्ये खाणे आवश्यक
◼️ भारतीयांच्या जेवणात संपूर्ण तृणधान्यांचे प्रमाण केवळ ४२ ग्रॅम (१० टक्के) इतकेच आहे.
◼️ भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद राष्ट्रीय पोषण संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दररोज किमान १२५ ग्रॅम संपूर्ण तृणधान्ये खाणे आवश्यक आहे
तृणधान्यांच्या कमी सेवनामुळे होणारे आजार
टाइप-२ मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयविकार इ.
महत्त्वाच्या शिफारसी
तज्ज्ञांनी या परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाय सुचवले आहेत.
◼️ फोर्टिफाइड पिठाचा वापर : संपूर्ण तृणधान्यांच्या पिठामध्ये अतिरिक्त पोषक घटक मिसळणे.
◼️ जनजागृती : महिला आणि गरजू लोकसंख्येसाठी पोषणतज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणे.
◼️ डिजिटल टूल्स : तृणधान्यांच्या पाककृतींसाठी डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणे.
◼️ धोरणात्मक बदल : पोषण हा केवळ कल्याणाचा भाग नसून, तो सार्वजनिक आरोग्याचा अनिवार्य भाग म्हणून धोरणांमध्ये समाविष्ट करावा.
अधिक वाचा: २०१७ च्या कर्जमाफीतील उर्वरित शेतकऱ्यांना ५०० कोटींचा निधी आला; कधी सुरु होणार वाटप?
