शेषराव वायाळ
एकेकाळी मोसंबीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यात आता या फळपिकाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सातत्याने घसरणारे भाव आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी मोसंबीच्या बागांकडे पाठ फिरवली असून, तालुक्यात आता केवळ ४०१.३० हेक्टरवरच मोसंबी शिल्लक राहिली आहे.
मागील तीन वर्षांपासून मोसंबीच्या पिकाची मोठी परवड होत आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे बागांचे अतोनात नुकसान झाले. शेतात जाण्याचे रस्ते खराब झाल्याने आणि बाजारात योग्य भाव न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपली फळे अक्षरशः शेतातच फेकून दिली.
फळ काळे पडणे आणि फळगळ होण्याच्या समस्यांमुळे मशागतीचा व खतांचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. यामुळे संतप्त झालेल्या काही शेतकऱ्यांनी उभ्या बागांवर नांगर फिरवून त्या मोडीत काढल्या आहेत.
शासकीय मदतीची मागणी
संकटात सापडलेल्या मोसंबी उत्पादकांना शासनाने तातडीने भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. केवळ भविष्यात कधीतरी भाव मिळतील या आशेवर काही मोजक्याच शेतकऱ्यांनी सध्या बागा टिकवून ठेवल्या आहेत; मात्र त्यांनाही सरकारी आधार मिळणे आवश्यक झाले आहे.
मागील काही वर्षापासून मोसंबीला भाव मिळेनासा झाला आहे. मोसंबीच्या बागेमुळे दुसरे कोणतेही आंतरपीक घेता येत नाही, त्यामुळे आर्थिक गणित कोलमडत असल्याने शेतकरी बागा काढून टाकत आहेत. यामुळे शेतकरी इतर पिकांकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. - अंगद मस्के, शेतकरी.
केळी अन् उसाकडे कल वाढला
मोसंबी पीक आता नामशेष होण्याच्या मार्गावर असताना, तालुक्यात जिथे पाणी मुबलक आहे, तिथे शेतकऱ्यांचा कल आता केळी आणि ऊस यांसारख्या नगदी पिकांकडे वाढू लागला आहे. मोसंबीच्या तुलनेत ही पिके अधिक फायदेशीर वाटत असल्याने शेतकरी पीक पद्धतीत बदल करत असल्याचे चित्र आहे.
मोसंबीच्या दराबाबत आता शाश्वती राहिलेली नाही. खते, पाणी व्यवस्थापन आणि मजुरीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्या तुलनेत परतावा मिळत नसल्याने शेतकरी या पिकाकडे दुर्लक्ष करत आहेत. - राम रोडगे, उपविभागीय कृषी अधिकारी, परतूर.
हेही वाचा : एक एकर दोडका ठरला पारंपरिक शेतीच्या तुलनेत लाख फायद्याचा; वाचा प्रकाशरावांची यशकथा
