वातावरण उबदार व सिंचनासाठी पुरेसे पाणी असल्याने यावेळी उन्हाळी तीळ पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. सध्या तिळाला सर्वाधिक १३ ते १५ हजार रुपये क्विंटल भाव मिळत असल्याने उन्हाळी तीळ फायद्याचा ठरणार आहे.
उन्हाळी तिळाची पेरणी ही जास्तीत जास्त फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी लागते. उशिरा पेरणी करणे टाळावे. पेरणीपूर्वी बियाण्याला बीजप्रक्रिया करावी. तीळ हे कमी दिवसांत येणारे पीक असून, सलग, आंतरपीक व मिश्रपीक म्हणूनही सर्व हंगामात घेता येते.
पिकाला २५ ते २७ अंश सेल्सिअस तापमान पोषक असून, येणाऱ्या पावसाचा उत्पादनावर विपरित परिणाम होतो. तिळाचे पीक चांगला निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. उन्हाळी पिकाला किंवा अर्ध-रब्बी पिकाला आवश्यकतेनुसार पेरणीपूर्व व पेरणीनंतर ताबडतोब ओलित करावे. त्यानंतर जमिनीच्या पोतानुसार १२ ते १५ दिवसांनी ओलित करावे.
फुलोऱ्याला सुरुवात होताना व बोंड्या भरताना ताण पडणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच या काळात संरक्षित ओलित द्यावे. यासोबत झाडाची पाने पिवळी पडून बोंड्या पिवळ्या होण्यास सुरुवात होताच पीक कापणीस तयार झाले असे समजावे, असे मार्गदर्शन कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात आले आहे.
फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत पेरणी हवी
उन्हाळी हंगामातील तिळाच्या पेरणीकरिता ३ ते ४ किलो बियाणे प्रति हेक्टर वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यालास बीजप्रक्रिया करावी. पेरणीची वेळ - उन्हाळी तिळाची पेरणी ही जास्तीत जास्त फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. तिळाचे बियाणे बारीक असल्याने त्यात समप्रमाणात वाळू किंवा गाळलेले शेणखत किंवा राख किंवा बारीक माती मिसळून पेरणी करावी.
खत व्यवस्थापन महत्त्वाचे
पेरणीच्या वेळेस अर्धे नत्र (१२.५ किलो प्रति हेक्टर) व पूर्ण स्फुरद (२५ किलो प्रति हेक्टर) देऊन पेरणीनंतर ३० दिवसांनी उरलेल्या नत्राची (१२.५ किलो प्रति हेक्टर) मात्रा द्यावी. पेरणीवेळी झिंक व सल्फर या सूक्ष्म अन्नद्रव्यांची जमिनीत कमतरता असल्यास प्रत्येकी २० किलो प्रति हेक्टर या प्रमाणात द्यावे, असे कृषी विभागाने सांगितले.
