नितीन काळेल
सातारा : शेती क्षेत्रात नवनवीन बदल होत असून शेतकऱ्यांकडून त्याचा स्वीकारही होत आहे. याच पद्धतीने आता सातारा तालुक्यातील निसराळे येथे 'एआय' अर्थात कृत्रिम बुद्धिमता तंत्रज्ञानावर आधारित १०० हेक्टरवर ऊस शेती होत आहे.
यासाठी राज्य कृषी विभागाने पुढाकार घेतला असून यानिमित्ताने महाराष्ट्रात 'एआय'चा प्रथमच वापर होतोय. यामुळे निसराळे रोल मॉडेल ठरणार आहे.
शेतीत क्रांतिकारक बदल होत आहेत. या बदलाचा वापर करून शेतकरी अधिक उत्पादन घेऊ लागलेत. तसेच त्यासाठी कृषी विभागाचीही मदत मिळत आहे.
यामुळे शेतकरी शेती उत्पादनातून कोटींची उड्डाणे घेऊ लागलेत. त्यातच आता शेती क्षेत्रातही एआय' चा (कृत्रिम बुद्धिमता) वापर वाढू लागला आहे.
सातारा जिल्ह्यातील कृषीक्षेत्रातही 'एआय'चे वारे जोरात वाहू लागलेत. राज्य कृषी विभागाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात कृषीअंतर्गत मोठे काम उभे राहिले आहे.
अशाच पद्धतीने आता सातारा तालुक्यातील निसराळे येथे ऊस शेतीत 'एआय'चा वापर करण्यास सुरुवात केली आहे. निसराळे गावात सुरुवातीला १०० हेक्टर क्षेत्रावर हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील पहिलाच हा 'एआय'चा प्रयोग असणार आहे. यामध्ये गावातील शेतकऱ्यांनीही सक्रिय सहभाग नोंदविलाय. यासाठी राज्य कृषी विभागाने फार मोठी भूमिका बजावली आहे.
तसेच याबाबतचा प्रस्तावही जिल्हा नियोजन समितीकडे देण्यात येणार आहे. त्यातून काही प्रमाणात खर्च केला जाणार आहे. त्यामुळे बळीराजाला हे आधुनिक तंत्रज्ञान वापरणे सोपे जाणार आहे.
'एआय' मुळे काय होणार?
- उत्पादन खर्चात बचत होणार आहे.
- कीटकनाशकाची केलेली फवारणी वाया जाणार नाही.
- खत, औषध पुरवठा करणे सोपे जाणार आहे.
- उसासाठीच्या पाण्यात बचत.
उत्पादनात वाढ होणार; ४० टक्के पाणी बचत..
- 'एआय'चे तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. यामुळे उत्पादनात वाढ होणार आहे.
- उसासाठी लागणाऱ्या पाण्यात ३० ते ४० टक्के बचत होणार आहे.
- त्यातच कृषी विभागाने जुलै २०२३ मध्ये निसराळे गावातील शेतकऱ्यांना सुपर केन तंत्रज्ञानाची माहिती दिली होती.
- ८० शेतकरी सहभागी झाले होते. याचा फायदा शेतकऱ्यांना झाला.
- उसाचे एकरी उत्पादन ११२ टनापर्यंत गेले आहे.
- १० ते १२ शेतकऱ्यांनी १०० टनाच्या पुढे एकरी उत्पादन घेतले आहे.
अधिक वाचा: Construct CCT : सलग समतल चर सीसीटी कसे खोदावेत; जाणून घ्या सविस्तर