कोल्हापूर : परतीच्या पावसामुळे यंदा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम उशिरा सुरू झाला. गेल्या २० दिवसांत राज्यातील १५० साखर कारखान्यांनी १ कोटी २५ लाख ६७ हजार टन उसाचे गाळप केले आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ४९ कारखान्यांची धुराडी अद्याप थंडच असून, कारखान्याच्या विस्तारीकरणासह आर्थिक अडचणीमुळे हंगाम सुरू झालेला नाही.
मागील हंगामात राज्यातील २०० साखर कारखान्यांनी ८ कोटी ५३ लाख टन उसाचे गाळप केले होते. यंदा उसाचे क्षेत्र वाढल्याने साधारणतः १० कोटी टनांपर्यंत गाळप जाईल, असा प्राथमिक अंदाज आहे; पण, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच उसाच्या उताऱ्याचा अंदाज येणार आहे.
विभागनिहाय सुरू न झालेले कारकाने
- अमरावती - २
- नागपूर - ३
- अहिल्यानगर - ४
- नांदेड - ५
- पुणे - ६
- छ. संभाजीनगर - ७
- कोल्हापूर - ९
- सोलापूर - १३
जिल्हानिहाय गाळप
जिल्हा - कारखाने संख्या - गाळप (टन) - साखर उतारा
- कोल्हापूर - १९ - १८ लाख ४ हजार ६०७ - ८.४२
- सांगली - १५ - १३ लाख ५९ हजार ६९२ - ८.१६
- सातारा - १३ - १३ लाख १५ हजार ७०९ - ८.६२
सर्वाधिक गाळप झालेले साखर कारखाने
- बारामती अॅग्रो - ४ लाख १९ हजार ११८ टन
- विठ्ठलराव शिंदे, माढा - ३ लाख ४३ हजार ८६ टन
- इंडिकॉन, कर्जत - २ लाख ८९ हजार २५ टन
- कृष्णा, रेठरे - २ लाख ६९ हजार ८२९
- वारणा - २ लाख ३९ हजार ९००
यंदा पावसामुळे हंगामाला उशीर झाला, उसाचे उत्पादन गतवर्षीच्या तुलनेत अधिक दिसते. साधारणतः १० कोटी टनांपर्यंत गाळप जाईल. तरीही डिसेंबर महिन्यात गाळपाचा अंदाज येऊ शकतो.
- विजय औताडे, अभ्यासक, साखर उद्योग.
