राजाराम लोंढे
कोल्हापूर : उसाची उपलब्धता कमी असल्याने राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहे. राज्यातील ३० तर देशातील ७७ साखर कारखान्यांची धुराडी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच थंड झाली आहेत.
देशात आतापर्यंत २१ कोटी ७५ लाख टन उसाचे गाळप झाले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत १ कोटी टनाने गाळप कमी झाले आहे.
संपूर्ण देशातच यंदा उसाचे उत्पादन कमी झाले आहे. एकसारखा पाऊस, उसाच्या वाढीच्या कालावधीत पडलेल्या जोरदार पावसामुळे उसाचा उतारा कमी मिळत आहे.
साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन सरासरी ७५ दिवस झाले आहेत. आतापर्यंत राज्यातील ३० तर देशातील ७७ कारखान्यांचा हंगाम बंद झाला आहे
उसाचे उत्पादन कमी झाल्याने साखरेने उसळी घेतली आहे. घाऊक बाजारात सध्या प्रतिक्विंटल ३८०० ते ३९०० रुपये दर मिळत आहे.
दृष्टिक्षेपात देशातील उद्योग
५३१ साखर कारखाने.
२७० लाख टन साखरेचे उत्पादन.
५५ लाख हेक्टर उसाचे क्षेत्र.
२३ कोटी टन उसाचे उत्पादन.
प्रमुख राज्यातील गाळप (हंगाम बंद झालेले कारखाने)
महाराष्ट्र : ७.४० कोटी (३०)
उत्तर प्रदेश : ६.८० कोटी (०२)
कर्नाटक : ४.३७ कोटी (३४)
नैसर्गिक कारणामुळे यंदा उसाचे उत्पादन घटल्याने साखरेचे उत्पादनही कमी होणार आहे. या हंगामाने देशातील साखर उद्योगातील असुरक्षितता उघड झाली आहे. घटते उत्पादन, पुनर्प्राप्ती दर आणि गाळपाचे प्रमाण यामुळे मोठी आव्हाने आहेत. - पी. जी. मेढे, अभ्यासक, साखर उद्योग
अधिक वाचा: केळी निर्यातीत सोलापूर जिल्ह्यातील ही दोन गावं जगाच्या नकाशावर; वाचा सविस्तर