अशोक डोंबाळे
सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांची २००२ मध्ये प्रतिदिन ३५ हजार ते ४० हजार टन ऊसगाळपाची क्षमता होती. यामध्ये दरवर्षी वाढ होऊन १६ कारखान्यांची गाळप क्षमता ८५ हजार टन प्रतिदिन झाली आहे.
कारखान्यांची गाळप क्षमता वाढत असताना, जिल्ह्यातील घटते उसाचे क्षेत्र भविष्यात साखर कारखान्यांसाठी आर्थिक संकट ठरणार आहे.
जिल्ह्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षात एक लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्र होते. २०२६ मध्ये जिल्ह्यात आडसाली, पूर्वहंगाम या दोन्ही हंगामांतील ऊस लागवड आटोपली आहे. सुरू हंगामातील ऊस लागवड शेतकरी करत आहेत.
सद्यःस्थितीला ९३ हजार २८२ हेक्टरपर्यंत उसाची लागवड झाली आहे. यामध्ये आणखी १० हजार हेक्टर वाढ झाली तरी मागील दोन वर्षाच्या तुलनेत चालू वर्षी जवळपास ३२ हजार हेक्टरने उसाचे क्षेत्र घटण्याचा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.
टेंभू, ताकारी, म्हैसाळ, अरफळ उपसा सिंचन योजनांमुळे जिल्ह्यात बागायती क्षेत्र वाढले आहे. पण, अनेक शेतकरी ऊस पीक परवडत नसल्यामुळे भाजीपाला, द्राक्ष, डाळिंबासह अन्य पिकांकडे वळले आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र घटत असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. एका बाजूला ऊस क्षेत्र घटत असताना, जिल्ह्यातील साखर कारखान्यांची गाळपक्षमता दिवसेंदिवस वाढत आहे.
जिल्ह्यात एकूण १९ साखर कारखाने आहेत. त्यापैकी तासगांव, कवठेमहांकाळ आणि आटपाडी हे तीन कारखाने बंद आहेत. उर्वरित १६ कारखाने यशस्वीरीत्या कार्यान्वित असून त्यांची एकूण गाळपक्षमता ८५ हजार टन प्रतिदिन आहे.
गळीत हंगामात १०० लाख टन गाळप करण्याची क्षमता जिल्ह्यातील कारखान्यांची आहे. ही बाब जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी आणि कारखानदारांसाठी अभिमानास्पद आहे.
पूर्वी गाळप हंगाम ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होऊन एप्रिल अखेरपर्यंत चालत असे म्हणजे १८० ते २०० दिवस चालत होते.
कारखान्यांची आर्थिक परिस्थिती बिकट
◼️ गेल्या दोन ते तीन वर्षांत हंगाम फक्त १०० दिवस चालतो. यामुळे कारखान्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली आहे.
◼️ २६० दिवसांपेक्षा जास्त ऑफ-सिझन राहिल्याने कारखान्यांचा खर्च वाढत आहे.
◼️ गाळप क्षमता वाढल्यामुळे कारखाने आर्थिक अडचणीत सापडतील, असा अंदाज कृषी अभ्यासांचा आहे.
सध्या किमान १५० दिवस तरी कारखाना चालू राहिला पाहिजे, यासाठी व्यापक संशोधन आवश्यक आहे. कारखान्यांनी वाढवलेली गाळपक्षमता आणि कर्नाटक सीमाभागात वाढलेल्या कारखान्यांमुळे नजीकच्या काळात कारखाने ८० दिवसांपेक्षा जास्त चालणार नाहीत, असे भयानक चित्र दिसत आहे. - आर. डी. माहुली, कार्यकारी संचालक, राजारामबापू साखर कारखाना
अधिक वाचा: द्राक्ष हंगामासोबतच बेदाणा निर्मितीलाही सुरवात; बेदाण्याच्या द्राक्षांना काय मिळतोय दर?
