Join us

...तरीही पुरंदर विमानतळासाठी साठ टक्क्यांहून अधिक शेतकरी जमीन देण्यास तयार? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 18:23 IST

purandar airport latest news प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी होणाऱ्या भूसंपादनाला विरोध म्हणून सात गावांतील शेतकऱ्यांच्या हरकतींचा पाऊस पाडला असला, तरी संमती देणाऱ्यांची संख्या सुमारे ६० टक्क्यांहून अधिक आहे.

पुणे : प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी होणाऱ्या भूसंपादनाला विरोध म्हणून सात गावांतील शेतकऱ्यांच्या हरकतींचा पाऊस पाडला आहे.

तरीही संमती देणाऱ्यांची संख्या सुमारे ६० टक्क्यांहून अधिक आहे. विमानतळाची अधिसूचना जारी होण्यापूर्वी या सातही गावांमधील सुमारे ६० टक्के जमिनींची विक्री झाली होती.

या सर्व शेतकऱ्यांनी यापूर्वीच जमीन देण्याची संमती दर्शविली असून, राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या पॅकेजमुळे आणखी शेतकऱ्यांनी जमीन देण्यासाठी संमती दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

विमानतळासाठी पारगाव, कुंभारवळण, वनपुरी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि उदाचीवाडी या सात गावांमधून २ हजार ६७३ हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. त्यानुसार, भूसंपादनाच्या ३२ (२) या नोटिसा जारी करण्यात आल्या.

त्या नोटिसांनंतर हरकती नोंदविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एका महिन्याची मुदत दिली होती. त्यानुसार, २३ मेपासून शेतकऱ्यांनी हरकती नोंदविण्यास सुरुवात केली.

सात गावांमधून ३० मे अखेर २ हजार ५२ हरकती मुदतीत नोंदविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पारगाव गावांमधून ७४७ इतक्या सर्वाधिक हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.

पुढील आठवड्यात या हरकतींवर सुनावणी होणार आहे. दरम्यान, जमीन देण्यास संमती देणारे पत्रही जिल्हा प्रशासनाकडे येत आहेत, असे सांगितले जात आहे.

भूसंपादनाचा मोबदला चांगला मिळण्याची आशा- संमती देणाऱ्यांची संख्याही आता वाढत असून, विमानतळाबाबत हे सकारात्मक पाऊल पडत असल्याचा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.- विमानतळासाठी जमीन देण्यासाठी आतापर्यंत सुमारे ७० टक्के शेतकऱ्यांनी संमती दर्शविली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.- विमानतळाची अधिसूचना जारी होण्यापूर्वी सुमारे ६० जमिनींची विक्री झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे होते. या सर्व शेतकऱ्यांनी जमीन देण्यास संमती दिली आहे.- या जमिनीचे संपादन करण्यास संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन आठवड्यांपूर्वी सांगितले होते.त्यानंतर, भूसंपादनाचा मोबदला चांगला मिळेल, या आशेवर अनेक शेतकरी जमीन देण्यासाठी तयार होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

अधिक वाचा: प्रतिएकर १० कोटी अन् विकसित भूखंड मिळणार असेल तरच विमानतळाला जमिनी देणार

टॅग्स :शेतीशेतकरीविमानतळविमानपुरंदरपुरंदरराज्य सरकारसरकारपुणेअजित पवार