वांगी (ता. कडेगाव) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याने सुरू असलेल्या गाळप हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला प्रत्येक मेट्रिक टनास ३ हजार ५०० रुपये देणार आहे.
याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मोहनराव कदम यांनी कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव सूर्यवंशी, संचालक रघुनाथ कदम, डॉ. शांताराम कदम उपस्थित होते.
मोहनराव कदम म्हणाले, सोनहीरा कारखान्याच्या कार्यस्थळावर संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. यामध्ये ३ हजार ५०० रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे.
हे पैसे शेतकऱ्यांना कसे द्यायचे याचा निर्णय लवकरच संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला जाईल. यावेळी सयाजी धनवडे, पी. सी. जाधव, पंढरीनाथ घाडगे, बापुसाहेब पाटील, शिवाजी गडळे, जगन्नाथ माळी, शरद कदम व सर्व संचालक उपस्थित होते.
उच्चांकी दर
कारखान्याने उच्चांकी दर दिला आहे. शेतकऱ्यांनी ऊस गाळपास सोनहिरा कारखान्याकडेच पाठवावा असे आवाहन मोहनराव कदम यांनी केले.
अधिक वाचा: शेतकरी संघटनांच्या रेट्यानंतर एफआरपीसह १०० रुपये घेण्यात यश; शेतकऱ्यांना १२५ कोटींचा फायदा
