महाबळेश्वरसारख्या पर्यटनाच्या ठिकाणी घेतला जाणारा स्ट्रॉबेरीचा प्रयोग आता नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यात यशस्वी ठरत असून, सध्या या प्रयोगाची चर्चा आदिवासी शेतकऱ्यांमध्ये होताना दिसून येत आहे. कारण सातपुड्यातील दाब परिसरातील तब्बल १४० शेतकऱ्यांनी यंदा स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील डाबसह वालंबा, साकली उमर, तोही कुंड, बेडाकुंड आदी गावांमध्ये शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत हायटेक पद्धतीने स्ट्रॉबेरी शेती स्वीकारली आहे. या परिसरात १० अंश सेल्सिअसच्या आत तापमान राहात असल्याने स्ट्रॉबेरी लागवड सुलभ होत असून उत्पादनातही लक्षणीय वाढ होत आहे.
या भागात प्रामुख्याने स्वीट सिंचन, स्वीट चार्ली, विंटर डाऊन, चैंडलर आदी वाणांची लागवड करण्यात येते. एकूण २५ हेक्टर क्षेत्रावर तब्बल १४० शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी पिकाची लागवड केली असून, प्रति किलो १५० ते २०० रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी भर पडत आहे. त्यामुळे शेतकरी कुटुंबाला रोजगारही मिळत आहे.
स्ट्रॉबेरी खरेदीसाठी गुजरात राज्यातील सुरत, राजकोट, बडोदा, अहमदाबाद येथील व्यापारी थेट शेतकऱ्यांपर्यंत येत आहेत. विशेष म्हणजे, सन २००८-०९ मध्ये या भागात केवळ एका शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी लागवड केली होती. आजच्या हंगामात ही संख्या १४० पर्यंत पोहोचली असून, शेत पिकातील हा बदल प्रेरणादायी ठरत आहे.
शासनाकडूनही या पिकासाठी आर्थिक व वस्तूरूप साहाय्य दिले जात आहे. महा-डीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर लागवड क्षेत्रानुसार स्ट्रॉबेरी रोपे, ठिबक सिंचन संच, मल्चिंग पेपर आदी स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. त्याचा फायदा शेतकरी घेत आहेत.
हायटेक शेतीच्या या यशस्वी प्रयोगामुळे अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासी शेतकरी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असून, नंदुरबार जिल्ह्याच्या कृषी नकाशावर स्ट्रॉबेरी शेतीने नवे पर्व सुरू केले आहे. मात्र यासाठी कृषी विभागाने शेतकन्यांमध्ये जनजागृती करण्याची अपेक्षा आहे.
बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी
• अक्कलकुवा तालुक्यातील अति दुर्गम समजल्या जाणाऱ्या डाब परिसरातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी आपल्या पारंपरिक शेती पिकांना फाटा देऊन विविध फळ बाग शेतीबरोबरच स्ट्रॉबेरी, मशरूम सारख्या शेतीकडे वळले असून तब्बल १४० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी लावली आहे.
• तथापि जास्त दिवस हे फळ टिकत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान देखील होत असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे शासनाने या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
स्ट्रॉबेरी लागवड केल्यामुळे डाब परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होत आहे. स्ट्रॉबेरी लागवड क्षेत्र वाढविण्यावर भर आहे. यंदा २५ हेक्टर क्षेत्र व १४० शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी लागवड केली आहे. विक्री होऊन उरलेल्या फळांची विक्री करण्यासाठी स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - सुरेश नामदार, तालुका कृषी अधिकारी, अक्कलकुवा.
शासनाच्या अनुदानामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन
• शासनाचा मुख्यतः विविध फळबाग पिकावर मोठा भर असून, यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान तरतूद केली आहे.
• स्ट्रॉबेरी पिकासाठी देखील अनुदान दिले जाते. या अनुदानातून शेतकरी पिकासाठी लागणारी साहित्य खरेदी करतात.
• साहजिकच दाब परिसरात सध्या स्ट्रॉबेरीच्या बागा मोठ्या प्रमाणात फुलल्या आहेत.
• अजूनही या परिसरातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील कृषी विभागाने जनजागृती करण्याची गरज आहे.
गावोगावी जावून शिल्लक माल विक्री करावा लागतो
व्यापारी प्रामुख्याने चांगल्या प्रतीची व आकाराने मोठी फळे तसेच एकच रंगाची फळे खरेदी करीत असल्याने उरलेली कमी आकाराची फळे शेतकऱ्यांना गावोगावी जाऊन विक्री करावी लागत आहेत. त्यामुळे उरलेल्या उत्पादनासाठी स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
मी माझ्या अर्धा एकर शेतात सहा हजार स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केली आहे. व्यापारी आकाराने मोठी, गडद रंग व चांगल्या प्रतीची फळे खरेदी करतो. परंतु उरलेली फळे आम्हाला गावोगावी जाऊन विक्री कराची लागतात. दिवसभरात साधारण १५ किलो फळांची विक्री होते. त्यामुळे पाच हजार पर्यंत पैसे येतात. स्ट्रॉबेरी फळ नाशवंत असल्याने जास्त दिवस साठवणूक करणे शक्य नसल्याने लवकर विक्री करावी लागते. - बोंडा जालमा पाडवी, शेतकरी, डाब.
