गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली जाते. खरिपातील धान पीक अवकाळी पावसामुळे हातून गेल्याने अनेक शेतकरी रब्बी हंगामावरच अवलंबून आहेत. मात्र आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता कृषी सेवा केंद्रातून होत असलेल्या बोगस बियाण्यांच्या विक्रीमुळे आणखी अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
नवेगावबांध व परिसरातील काही कृषी केंद्रांतून बोगस व महाराष्ट्र राज्यात विक्रीवर बंदी असलेले धान व इतर पिकांचे बियाणे सर्रास विकले जात असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. हंगामाच्या ऐनवेळी शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे उगवले नसल्याने रोवणीच अडचणीत आली आहे.
परिणामी शेतकरी मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जात आहेत. छत्रपती टी पॉइंट चौकातील एका कृषी सेवा केंद्रातून सावरटोला येथील महिला शेतकरी यशोदा डोये यांनी धान पिकाचे बियाणे खरेदी केले होते. पेरणी करून महिना उलटूनही बियाणे अंकुरले नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित दुकानदाराकडे तक्रार केली.
मात्र पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने दुकानदाराने जुनी पिशवी परत मागून दुसरे बियाणे देण्याचे आमिष दाखविले. यानंतर ना नवीन बियाणे दिले, ना नुकसानभरपाई देण्यात आली. उलट दुकानदाराने उर्मटपणे वागणूक देत टाळाटाळ केल्याचा आरोप शेतकरी महिलेने केला आहे. असाच प्रकार चान्ना बाकटी येथील एका कृषी केंद्रात घडला.
शेतकऱ्यांना तक्रारीनंतर दुसरे बियाणे देऊन प्रकरण दडपण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे संबंधित दुकानदारांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. बोगस व निकृष्ट दर्जाचे बियाणे तसेच औषधी विक्री करून अधिक नफा कमावण्याचा प्रकार सुरू असतानाही कृषी विभाग व संबंधित शासकीय यंत्रणा जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. काही प्रकरणांत ग्राहक मंचाकडे ही तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
नवेगावबांध टी पॉइंट चौकातील विजय कृषी सेवा केंद्रातून २४ डिसेंबरला श्री लेखा प्रजातीचे धान बियाणे खरेदी केले. मशागत करून पेरणी केली; मात्र महिना झाला तरी बियाणे अंकुरले नाही. दुकानदाराकडे तक्रार केली असता त्याने टाळाटाळीचे उत्तर दिले. संबंधित कृषी केंद्रावर कारवाई करून नुकसानभरपाई देण्यात यावी. - यशोदा डोये, महिला शेतकरी, सावरटोला.
हेही वाचा : एक एकर दोडका ठरला पारंपरिक शेतीच्या तुलनेत लाख फायद्याचा; वाचा प्रकाशरावांची यशकथा
