Join us

Ranbhaji : मान्सून आधीच पावसाळी रानभाज्यांची बाजारात रेलचेल; माहीतगार खवय्यांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 18:01 IST

Ranbhajya दरवर्षी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात मान्सून सक्रिय झाला की, जुलैच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात रानभाज्या बाजारात विक्रीसाठी येतात. यंदा ८ जूनला मृग नक्षत्र सुरू होत आहे.

हेमंत आवारीअकोले : दरवर्षी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात मान्सून सक्रिय झाला की, जुलैच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात रानभाज्या बाजारात विक्रीसाठी येतात. यंदा ८ जूनला मृग नक्षत्र सुरू होत आहे.

मात्र तत्पूर्वीच मान्सूनपूर्व अवकाळीने डोंगर माथ्यावर जोरदार हजेरी लावल्याने गुरुवारच्या अकोले आठवडे बाजारात कोळू, शिंदळमाकड, चाईकोंब या रानभाज्या दाखल झाल्यात. रानभाज्या खरेदीसाठी माहीतगार खवय्यांची झुंबड दिसू लागली आहे.

आदिवासी महिला रान फिरून रानभाज्या गोळा करतात आणि बाजारात विक्रीसाठी आणतात. भाजी विकण्यासोबत रानभाजीचे औषधी गुण आणि भाजी करण्याची पद्धत आपल्या बोलीभाषेत ते ग्राहकांना सांगतात. दरवर्षी रानभाजी विक्रीतून या आदिवासी शेतकऱ्यांना बऱ्यापैकी लाभ होतो.

मानवी आरोग्यास हितकारक रानभाज्या गर्दणी, टाकळी, बहिरवाडी, उंचखडक आंबिकानगर कळस बुद्रुक व खुर्द, घोरपडावाडी, मांडतदरा, निर्गुडवाडी भागातील आदिवासी महिला रानभाज्या घेऊन विक्रीसाठी येतात.

पावसाळ्यात रानात शिंदळमाकड, कोळू, तांदुळचा, चाईकोंब या रानभाज्या उगवणाऱ्या शक्तीवर्धक, आरोग्यवर्धक असून सध्या या भाज्या बाजारात विक्रीसाठी येत आहे. कुरडू, बडदा, भारंबी, चिभूट, आंबटवेल या रानभाज्या दुर्मीळ होत चालल्या आहेत.

या रानभाज्यात कार्बोहायड्रेट्स व अँटिऑक्सिडन्ट म्हणून त्या काम करतात. शिंदळमाकड व काटेरी करटुले या रानभाज्या कारल्यासारख्या चवीला कडू असतात. मात्र, या भाज्या पित्तनाशक आहेत.

या भाज्या खाल्ल्याने पित्तामुळे होणारी जळजळ, करपट ढेकर आदी विकार कमी होऊन पचनशक्ती वाढते. पोटाचे विकार दूर होतात.

अकोलेतील निसर्गात म्हैसवेल, हादगा, चंदनबटवा, आंबटवेल, भोकर, सुरण, कुई, काटेमाठ, हिरवा व लालमाठ, आंबाडी, गुळवेल, चाईबोंडे, भूई-आतली, बांबूचा कोंब, रानओवा, आंबटचुका, तेहडा, फांदभाजी, रानतोंडली, कॉदुरसा, रानआलू, कडू शेरणी, कडूवालुक अशा आरोग्यवर्धक भाज्या मिळून येतात.

शिंदळमाकड खडकाळ माळरानावर वाढतात. कॅक्टस कांडीसांबर सारखी रानभाजी आहे. या रानभाज्या या शरीरातील विषद्रव्याचा नाश करतात आणि झीज वेगाने भरून काढतात. नव्या पेशीच्या निर्मितीचा वेग वाढवतात.

रानभाज्यांचे महत्त्व आणि त्या तयार करण्याची पद्धत याचा अधिक प्रचार झाल्यास आरोग्यवर्धक पिढी निर्माण होण्यास मदत होईल आणि आदिवासींना आर्थिक उत्पादनाचा स्रोत उपलब्ध होईल.

अनेकदा रानभाजी बाजारात विक्रीसाठी येते. पण, काहींना या भाज्यांची माहिती नसते, म्हणून ते विकत घेत नाहीत. त्यामुळे रानभाज्यांचा प्रचार व प्रसारासाठी विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे.

असे होते दर..कोळू जुडी ३०-४० रूपये.चाई कोंब २० रूपये जुडी.शिंदळमाकड २० रूपये वाटा असे रानभाजी विक्रीचे दर होते.

पाळीव जनावरांना तिवा आजार होतो, ताप येतो, जीभ काटेरी होते, जनावर चारा खात नाही अशावेळी शिंदळमाकड, बडदाकंद, आंबटवेल, आळूकंद गुणकारी ठरते. तिवा उपचारासाठी साधारण हजार बाराशे रूपये औषधी खर्च येतो. पण आपण २० रुपयांची मुठभर शिंदळमाकड जनावराला चारली तरी आजार बरा होतो. - विजया पाडेकर ठोंबाडे, रानभाज्या माहीतगार

रानभाज्या औषधी गुणाच्या असतात. मीठ मिरची टाकून केलेली रानभाजी चांगली चवदार बनते. शिंदळमाकड थोडीच मिळाली. फक्त ४० रुपयांची विकली. बाकी पाहुणी आजारी होती, तिला दिली. - बबुबाई पथवे, रानभाज्या विक्रेती महिला

गुळवेल, कडमडवेल, रानओवा या औषधी गुणधर्म असलेल्या भाज्या जंगलात टिकून आहेत. वनविभागाने रानभाज्यांच्या माहितीचे फलक बाजारतळावर लावल्यास रानभाज्या प्रकाश झोतात येतील. - रमाकांत डेरे. पर्यावरणप्रेमी

अधिक वाचा: सातबारा उताऱ्यांमधील चुकांच्या दुरुस्तीसाठी भूमिअभिलेख विभागाचा नवा निर्णय; जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :भाज्यामोसमी पाऊसपाऊसनिसर्गपर्यावरणअकोलेआरोग्यअन्नजंगल