पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने ऊस पिकात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी पहिल्या पाच हजार शेतकऱ्यांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वानुसार विनामूल्य सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.
आत्तापर्यंत ८५० शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला असून उर्वरित चार हजार १५० शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे.
व्हीएसआयमध्ये रविवारी झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे माजी अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, राजेश टोपे, विश्वजित कदम, बाळासाहेब पाटील, खासदार विशाल पाटील उपस्थित होते.
ऊस शेतीमध्ये एआयचे तंत्रज्ञान वापर करण्यासाठी प्रति हेक्टर २५ हजार रुपयांचा खर्च ठरविण्यात आला होता. यात व्हीएसआयचा वाटा नऊ हजार २५० रुपये, शेतकऱ्यांचा वाटा नऊ हजार रुपये आणि संबंधित साखर कारखान्याचा वाटा सहा हजार ७५० रुपये असा होता.
मात्र, नव्या निर्णयानुसार व्हीएसआयचा वाटा दुप्पट झाला असून त्यामुळे शेतकऱ्यांना आता कोणताही आर्थिक भार सोसावा लागणार नाही.
त्यामुळे आता व्हीएसआय १८ हजार २५० रुपये प्रति हेक्टर देणार तर साखर कारखाने ६ हजार ७५० रुपये भरतील. अशा प्रकारे एकूण २५ हजार रुपयांचा खर्च पूर्णपणे भरला जाणार आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले, एआयचा वापर वाढण्यासाठी राज्य सरकार आणि व्हीएसआय प्रयत्न करीत आहे. पाच हजार शेतकऱ्यांना व्हीएसआयकडून प्रतिहेक्टरी आता १८ हजार २५० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ३ रुपयांचे रोप २ रुपयांना देणार आहे.
अधिक वाचा: आता जमीन मोजणीचे प्रकरणे ३० ते ४५ दिवसांत निकाली लागणार; महसूल विभागाने घेतला 'हा' निर्णय