श्रीगोंदा : ओंकार शुगर ग्रुपच्या विविध कारखान्यांनी चालू गाळप हंगामात ५० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, १२७० कोटी रुपयांची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती ओंकार शुगर ग्रुपचे संस्थापक बाबुराव बोत्रे पाटील यांनी दिली.
हिरडगाव येथील गौरी शुगर कारखान्याने ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ४ लाख २३ हजार १८६ मे. टन गाळप केले होते. त्यासाठी १३१ कोटी १८ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले आहे.
ओंकार शुगर ग्रुपने उसाला सर्वाधिक भाव देण्याचे धोरण घेतल्याचे सांगून ते म्हणाले, की शेतकरी जगला पाहिजे, शेतकऱ्याच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे.
कुठेही वजन करा आणि ऊस घेऊन या. काटा बरोबरच राहील, शेतकऱ्यांना सर्वोच्च ऊस दर दिला जाईल. बिल वेळेत मिळेल, ही आमची भूमिका होती.
ओंकार शुगर ग्रुपच्या विविध युनिट्समध्ये आधुनिक यंत्रसामग्री, पारदर्शक व्यवस्थापन आणि नियोजनबद्ध गाळपामुळे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळपाला गेला.
त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला नाही. शेतकऱ्यांचा ऊस हा आमची जबाबदारी आहे, या भावनेतून ओंकार ग्रुप काम करीत असल्याचे बोत्रे पाटील म्हणाले.
अधिक वाचा: ट्रम्पचा झटका कापूस, सोयाबीन अन् इथेनॉल उत्पादकांना फटका; शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार
