कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कुटुंबातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी 'लक्ष्मीमुक्ती योजना' राबविण्यात येत आहे.
या अंतर्गत शेतजमिनीवर पत्नीच्याही नावाची नोंद करून नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करवीरचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी केले आहे.
'लक्ष्मीमुक्ती' योजनेमध्ये पतीच्या नावे असलेल्या शेतजमिनीमध्ये पत्नीचे सहहिस्सेदार म्हणून नाव विनामूल्य नोंदवता येते. यासाठी कोणत्याही प्रकारचे नोंदणी शुल्क किंवा मुद्रांक शुल्क घेतले जाणार नाही.
यासाठी आवश्यक कागदपत्रे
- पती व पत्नी यांच्या संयुक्त स्वाक्षरीतील अर्ज.
- गटाचा सातबारा उतारा व ८-अ उतारा.
- आधारकार्ड प्रत.
- रेशनकार्ड प्रत.
- विवाह नोंदणी प्रमाणपत्र.
- पोलिस पाटील यांचा कायदेशीर पत्नी असल्याचा दाखला.
वरील कागदपत्रे या योजनेसाठी सादर करणे आवश्यक आहे. अर्जदार पती-पत्नीने वरील कागदपत्रांसह संबंधित ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे अर्ज करावा.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून करवीरचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान असा १०० दिवसांचा प्राधान्य कृती कार्यक्रम सुरू आहे.
त्या अंतर्गत महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून लक्ष्मीमुक्ती योजना करवीर तालुक्यात राबविण्यात येत आहे.
अधिक वाचा: Pik Vima Hapta : यंदा पीकविमा हप्त्यासाठी शेतकऱ्यांना मोजावे लागणार जास्तीचे पैसे; वाचा सविस्तर