कोल्हापूर जिल्ह्याला उसाचे आगर म्हणून ओळखले जाते. परंतू, क्षेत्राचा विचार करता अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे चित्र आहे. पारंपरिक पद्धती, पाण्याचा अति वापर, पिक फेरपालट न करणे यामुळे उत्पादन दिवसेंदिवस घटत आहे.
हेक्टरी उत्पादन वाढवण्यासाठी कृषी विभागाने मोहीम सुरू केली आहे. जमीन व हवामानाचा विचार करता कोल्हापूर जिल्ह्यात उसाची उत्पादकता सरासरी १०० टन प्रती हेक्टरीपेक्षाही कमी आहे.
ऊस पिकाचे सुधारित वाण, लागवड तंत्रज्ञान, सिंचन व खत व्यवस्थापनामध्ये मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांनी अत्यंत प्रभावी संशोधन केले आहे.
आज त्या तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक प्रगतशील शेतकऱ्यांनी एकरी १५० टन उत्पादकता गाठली आहे. एकरी १०० टन उत्पादकता काढणारे शेकडो शेतकरी आपल्या विभागात आहेत.
नवीन पिढीमध्ये ऊस लागवडीमध्ये प्रेरणा तयार करावयाची असेल, तर उपलब्ध तंत्रज्ञान प्रत्येक ऊस उत्पादन करणाऱ्या शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.
मर्यादित उपलब्ध उसामुळे जिल्ह्यातील २३ कारखाने मागील ३ वर्षातील सरासरीचा विचार करता अपेक्षित १८० दिवसांपैकी केवळ १२० दिवसांपेक्षाही कमी दिवस गाळप करत आहेत. त्यामुळे जादाची वाहतूक करून कार्यक्षेत्राबाहेरून ऊस आणावा लागत आहे.
जिल्ह्यातील सुमारे २ लाख हेक्टर इतक्या विस्तीर्ण क्षेत्रावर पसरलेले ऊस क्षेत्र आणि त्यावर अवलंबून असलेले ऊस उत्पादक, कामगार, कारखानदार व व्यापारी यांचा विचार केला, तर आपण सुनियोजितपणे लक्ष्य निश्चित करून १ लाख हेक्टर क्षेत्रावर अंमलबजावणी झाल्यास २५ लाख टन ऊस उत्पादन वाढेल. ज्याची ढोबळ किंमत ७५० ते ८०० कोटी होईल.
१२५ टन ऊस उत्पादन प्रकल्पाच्या ५ वर्षांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत उत्पादन तंत्रज्ञान पोहोचून आवश्यक निविष्ठाचा कमीत कमी व कार्यक्षमतेने वापर करून उच्चतम उत्पादकता कारखान्याच्या नजीकच्या कार्यक्षेत्रातच उपलब्ध होण्यासाठी पालकमंत्री यांचे संकल्पनेतून हेक्टरी १२५ टन उत्पादकता वाढ अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे.
सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तसेच कृषी विभाग, सर्व साखर सहसंचालक, शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्या, वंसतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे कृषी विज्ञान केंद्र यांच्या समन्वयाने व आवश्यक तेथे सक्रिय सहभागाद्वारे प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
- नामदेव परीट
कृषी उपसंचालक, कोल्हापूर
अधिक वाचा: कोल्हापूर जिल्ह्यातील 'ही' चार धरणे १०० टक्के भरली; इतर धरणांत किती पाणीसाठा?