लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील किल्लारी येथील श्री नीळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने चालू हंगामात दीड लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण करून विक्रमी कामगिरी नोंदविली आहे. काटेकोर नियोजन, आधुनिक यंत्रसामग्रीचा प्रभावी वापर आणि शेतकरी व कारखाना प्रशासनातील उत्तम समन्वयामुळे हे उद्दिष्ट वेळेत साध्य झाले आहे.
त्यामुळे संपूर्ण परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या कारखान्यात दररोज सरासरी २८०० ते २९०० मेट्रिक टन प्रति दिन इतक्या क्षमतेने ऊस गाळप सुरू आहे. विशेष म्हणजे, यंदा साखर उताराही चांगला मिळत असल्याने कारखान्याच्या आर्थिक स्थितीला भक्कम आधार मिळाला आहे. आ. अभिमन्यू पवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली कामगार, अधिकारी आणि संचालक मंडळाने एकसंघपणे केलेल्या प्रयत्नांचे हे यश असल्याची शेतकऱ्यांत भावना आहे.
कारखाना प्रशासनाने ऊस उत्पादकांना दिलासा देत म्हटले आहे की, ज्या शेतकऱ्यांचा ऊस अद्याप शिल्लक आहे, त्यांनी कोणतीही चिंता करू नये. शेवटच्या शेतकऱ्याचा ऊस गाळपा होईपर्यंत कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत विश्वास आणि समाधानाची भावना अधिक बळावली आहे.
नीळकंठेश्वर कारखाना हा शेतकऱ्यांचा आधारस्तंभ ठरत आहे. वेळेवर गाळप, चांगला उतारा आणि शेतकरी हिताला प्राधान्य देणाऱ्या धोरणांमुळे कारखान्याने विश्वासार्हता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. आगामी काळातही शेतकरी, कामगारांच्या सहकार्याने आणखी मोठी उद्दिष्टे गाठली जातील, असा विश्वास वाढला आहे.
हेही वाचा : तूर शेती ठरतेय शेतकऱ्यांना फायद्याची; पारंपरिक पिकांना फाटा देत तयार होतंय तूर हब
