जिजाबराव वाघ
जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यात यंदा कपाशीचे पेरणी क्षेत्र घटणार असून मक्याची लागवड वाढणार आहे. परिसरात खरीप हंगामपूर्व मशागतीला वेग आला आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे हे वेळापत्रक काहीसे लांबले होते.
दरम्यान ७ ते १० जून नंतरच शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. बुधवार अखेर तालुक्यात कपाशीची एक ते दीड टक्के तर अर्धा टक्का मक्याची लागवड झाली आहे.
कपाशीच्या क्षेत्रात घट होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यामागे मुख्यतः कापसाला मिळणारा कमी हमीभाव, वाढता उत्पादन खर्च व शाश्वत उत्पन्नाची चिंता ही प्रमुख कारणे आहेत.
कपाशीला कात्री तर मक्याची लागवड वाढणार
कपाशीच्या तुलनेत उत्पादन खर्च कमी आणि मार्केटमध्ये स्थिर दर मिळत असल्यामुळे शेतकरी मक्याच्या लागवडीकडे वळत आहेत.
२०२४ मध्ये १७ हजार १८० हेक्टर क्षेत्रावर तर यंदा १७ हजार २०० हेक्टरवर मका लागवड होणार आहे. गतवर्षी तुरीचे क्षेत्र ६३४ हेक्टर होते, यंदा ते ६८० हेक्टर होईल. भुईमुगाच्या क्षेत्र १७० हेक्टरवरून २४६ हेक्टरवर जाण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे ज्वारी, बाजरी व मूग या पिकांच्या क्षेत्रात घट होणार आहे. ज्वारीचे क्षेत्र ६०८ हेक्टरवरून ४८० हेक्टरवर, बाजरी २४३९ वरून २२२२ हेक्टरवर येण्याची शक्यता आहे. मूग ६०७ वरून ५३० हेक्टरवर, तर उडीद ५० वरून ५३५ हेक्टरवर होईल. तालुक्यात ६२ हजार ६५१ हेक्टरवर यंदा कपाशीची लागवड होणार आहे. गतवर्षी हे क्षेत्र ६२ हजार ८५१ हे. होते.
खतांचा वाढता वापर
रासायनिक खतांचा वापर दरवर्षी वाढत असून, यंदा सुमारे ३२ हजार ५० मेट्रिक टन खतांची मागणी आहे. त्यापैकी २९ हजार १९९ मेट्रिक टन खतांची मंजुरी मिळाली आहे. १० हजार ८८२ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे.
चाळीसगाव तालुक्यात यंदा कपाशीचे क्षेत्र कमी होणार आहे. मक्याची लागवड वाढण्याचे संकेत आहे. शेतकऱ्यांनी ७ ते १० तारखेनंतर पेरण्या करणे योग्य राहील. - अभिषेक लगड, तालुका कृषी अधिकारी, चाळीसगाव.
पर्यायी पिकांकडे वळण्याची शक्यता
शेतकरी कापसाऐवजी मका, तूर, भुईमूग या पर्यायी पिकांकडे वळण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्या वतीने नुकतीच आढावा बैठक पार पडली. यावेळी बोगस बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी कारवाईचे निर्देश देण्यात आले.